सुनीता शिंदे
पटवाढीसाठी विविध फंडे – पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांच्या रांगा
पुढील वर्षी तीन हजारांचा टप्पा पार करू
पालिका शाळांच्या प्रगतीबाबत बोलताना प्रशासन अधिकारी जमिला मुलाणी म्हणाल्या, गत काही वर्षांमध्ये कराड नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकत चेहरामोहरा बदलला आहे. खासगी शाळांप्रमाणेच अनेक सुविधा या शाळांमध्येही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता वाढीवरही भर दिला जात असल्याने अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर चमकत आहेत. पालिका शाळांची बदलती स्थिती लोकांपर्यंत पोहोचावी. यासाठीच शिक्षण विभागामार्फत विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत शाळांमधील विद्यार्थी संख्येचा तीन हजारांचा टप्पा पार करू, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
कराड – कराड नगर पालिकेचा शिक्षण विभागाचा डंका आता सर्वदूर पोहोचला आहे. अनेक शाळांनी कात टाकत आपले रूपडे पालटल्याने शाळेतील विद्यार्थीसंख्याही वाढत चालली आहे. गतवर्षीपेक्षा एकूण विद्यार्थी संख्येत यावर्षी 350 ने वाढ झाली आहे. पालिका शाळांमधून देण्यात येणारे शिक्षण, विविध प्रकारच्या सुविधा यामुळे नागरिकांची या शाळांविषयी असणारी मानसिकता बदलत चालली असून आपल्या पाल्यास शाळेत प्रवेश मिळावा. यासाठी शाळांच्या बाहेर रांगेत उभे राहिलेले पालकही दिसत आहेत.
कराड शहरच नाही तर शहरालगत असणाऱ्या गावांमधूनही पालक आपल्या पाल्याला इथेच प्रवेश मिळावा. यासाठी हट्टाहास धरत असल्याचे सध्या दिसत आहे. पालिकेचा शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे खऱ्या अर्थाने यश आहे असे म्हणायला हरकत नाही. कराड पालिकेच्या सध्या दहा शाळा कार्यरत आहेत. या शाळांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम सुरू आहे. आजपर्यंत अनेक थोर नेते व समाजसुधारक या शाळांमधून घडले आहेत. त्यामुळे पालिका शाळांची ख्याती सर्वदूर आहेच. परंतु मध्यंतरीच्या काळात खासगीकरणामुळे या शाळामागे पडल्या होत्या.
गेल्या काही वर्षात मरगळलेली अवस्था व आपली जुनी कात टाकत मोठा अविस्मरणीय बदल या शाळांनी स्वीकारला. त्यासाठी शहरातील अनेक दानशूर मदतीसाठी सरसावले. बघता-बघता या शाळांचे रूपडेच पालटले. शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यात या शाळांना यश आले आहे. नगरपालिका शाळा क्रमांक तिनने प्रथम बदलाचा स्वीकार केला. शाळांच्या गेटपासून भिंती, वर्गखोल्या यामध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला गेला. खासगी शाळांमध्ये असणाऱ्या बसेसप्रमाणेच पालिका शाळेतही मुलांना आणण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली. तसेच काही विद्यार्थी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये गुणवत्तेत आल्याने परिसरातील काही पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश घेण्यास सुरू केले. या शाळेपाठोपाठ नगपालिका शाळा क्रमांक नऊ, सात या शाळांनी देखील आपल्या शाळांमध्ये नावीण्याचा अंगीकार केला. ही शाळा पूर्णपणे डिजिटल झाली आहे. शाळा क्रमांक एक व दोन या शाळांना जागेची व्यवस्था नसल्याने यावर्षीपासून दैत्यनिवारणी मंदिर परिसरात येथील विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे.
अनेक खासगी शाळा व विविध क्लासेसचे संचालक आपल्या शाळातील विद्यार्थी संख्या वाढावी. यासाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात. त्याचप्रमाणे पालिका शाळाही वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थीपट वाढावा यासाठी पालिका शिक्षण विभागाने एक शक्कल लढविली आहे. शाळांमध्ये असणाऱ्या विविध सुविधा व योजनांच्या माहितीची ऑडिओ क्लिप तयार केली आहे. ही धून पालिकेच्या घंटागाड्यांवरून वाजविण्यात येणार आहे. गल्लोगल्ली ही धून वाजवण्यात येत आहे. एकप्रकारे जनजागृतीचा वेगळा फंडा शिक्षण विभागाने अवलंबिल्याचे दिसत आहे. यामध्ये शाळांमधील सुविधा, संगणक कक्ष, आयएसओ मानांकन दर्जा, बोलक्या भिंती, मोफत सुविधा, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी आदीविषयी माहिती देण्यात येत आहे. आपल्या परिसरातील असणाऱ्या अनेक पोपटपंचींना भुलून वेळ नका.
दवडू भविष्यासाठी नगपालिका शाळाच निवडू अशा आशयाचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ही धून घंटागाड्यांच्या स्वच्छता गीतांबरोबरच वाजवली जात आहे. जेणेकरून गल्लोगल्ली फक्त नगरपालिका शाळांची माहिती सर्वांपर्यंत पोहचून पालिका शाळांचा विद्यार्थीपट वाढावा हा एकमेव उद्देश आहे. याचा पालिका शाळांना चांगलाच फायदा झाला आहे. त्याचबरोबर कार्यानुभव प्रदर्शन, बालसंस्कार शिबिरे, बालवाचक वर्ग, विविध सण-समारंभ साजरे केले जात आहेत. शाळांचा बदललेला चेहरामोहराही लोकांच्या नजरेत भरत असल्याने आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य इथेच घडू शकते अशी खात्री जणू पालकांना वाटू लागली आहे.