आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून?
“मायेचा ओलावा’
शंभर मुले शैक्षणिक दत्तक घेणार ः वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मदत
दुष्काळग्रस्तांना विलास लांडे यांचा
पिंपरी – वाढदिवसावर कोट्यावधींचा खर्च करुन “चमकोगिरी’ करण्याची चढाओढ राजकीय नेत्यांमध्ये लागली आहे. एकीकडे अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राजकीय नेत्यांमधील माणुसकी आटत चालल्याचे चित्र आहे. अशांसमोर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. वाढदिवसावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील शंभर मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या उपक्रमाची चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात रंगली आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. याबाबत विलास लांडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भोसरी मतदार संघाची मागील चार वर्षात केवळ शो-बाजी सुरू असून विकास कामांची बोंब झाली आहे. संत समूह शिल्प, बालनगरी सारखे महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. एवढेच काय तर भोसरीची कमान देखील अपुर्णावस्थेत आहे. बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, महापालिकेचे कंत्राटदार दहशतीखाली आहेत. कंत्राटदार काम करायला तयार नाहीत. उद्योगांचे स्थलांतरण सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवाराचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले. विधानसभा निवडणुकीत भोसरीतून केवळ राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिल. कारण पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे भोसरीकर साक्षीदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मोदी अथवा अन्य कोणताही पॅटर्न चालणार नाही. येथे केवळ विकासाचा पॅटर्न चालेल, असा दावा विलास लांडे यांनी केला.
शंभर मुले शैक्षणिक दत्तक घेणार ः वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मदत
परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि आग ओकणारा सूर्य यामुळे राज्यातील अनेक गावांवर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. राज्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर जणू सूर्यदेव कोपला आहे. आठवडा, दोन आठवडे पाणी मिळत नाही. मानव, जनावरे सर्वजण दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाले आहेत. परंतु, शहरातील सध्याचे लग्न सोहळे तसेच राजकीय नेत्यांचे वाढदिवस पाहता त्यांना त्याचे काहीही सोयरेसुतक नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यास विलास लांडे अपवाद ठरले आहेत. उद्या (दि. 1) त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा होत आहे.
यानिमित्त त्यांनी वाढदिवसावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील शंभर मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे जाहीर केले आहे. चारा छावणीला आर्थिक मदत तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बि-बियाणे वाटप केले जाणार आहे. आपला वाढदिवस साजरा न करता दुष्काळग्रस्त भागात मदत करण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
विलास लांडे यांनी यापूर्वी बीड तालुक्यातील दुष्काळग्रस्त आमला गावात चारी खोदत पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे हे गाव दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली आहे. दुष्काळग्रस्त गावांना तात्पुरत्या स्वरुपात मदत करण्याऐवजी या गावातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना शैक्षणिक घेण्याचा निर्णय विलास लांडे यांनी घेतला आहे.
दुष्काळग्रस्त भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य देखील दुष्काळाने होरपळून जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी या मुलांना शैक्षणिक मदतीसाठी हात पुढे करणे गरजेचे आहे. शिक्षण घेवून ही मुले पुढे त्यांच्या गावातीलच नव्हे तर राज्यभरातील दुष्काळ दूर करतील, असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्नाबाबत बोलताना विलास लांडे म्हणाले की, शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहराला होणारा पाणी पुरवठा मर्यादीत असल्यामुळे मागील दोन वर्षात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने चोविस तास पाणी पुरवठ्याची योजना हाती घेतली आहे. परंतु, आडातच नसेल तर पोहऱ्यात पाणी कुठून येणार, त्यामुळे पाण्याचे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे.
आंद्रा, भामाआसखेडमधून पाणी आणण्याचे नियोजन आहे. कालांतराने हा साठा देखील मर्यादित होणार आहे. त्यामुळे सांडपाणी पुर्नवापर, पावसाळी पाण्याचा फेरवापर, पाणी गळती रोखणे, शहरात पाण्याचे समान वाटप, रावेत बंधाऱ्यातील गाळ काढून त्याची दुरुस्ती करणे, नवीन बंधारा बांधणे गरजेचे आहे. पवना धरणाचे मजबुतीकरण झाल्यास त्याची साठवण क्षमता वाढणार आहे. त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. महापालिकेने आत्तापासून पाणी पुरवठ्याचे नियोजन न केल्यास भविष्यात दुष्काळग्रस्त गावांसारखी परिस्थिती शहरावर ओढावू शकते, याकडे विलास लांडे यांनी लक्ष वेधले.