पहिल्या शंभर दिवसात वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करणार; निर्यातीबरोबरच देशांतर्गत व्यापार वाढविण्यासाठी मदत होणार
नवी दिल्ली: देशांतर्गत व्यापार आणि निर्यात वाढायची असेल तर वेगळा वस्तू वाहतूक विभाग निर्माण करण्याची गरज आहे. वाणिज्य मंत्रालयाने पहिल्या शंभर दिवसांत करायच्या कामांमध्ये या प्रस्तावाचा समावेश केलेला आहे.
गेल्या एक वर्षापासून अशा प्रकारच्या संकल्पनेवर विचार करण्यात येत आहे. नव्या सरकारने पहिल्या शंभर दिवसांत वस्तू वाहतूक क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन मंत्रालयात यासाठी वेगळा विभाग निर्माण करावा असे या आराखड्यात सुचविण्यात आलेले आहे. सध्या यासाठी वेगळा विभाग नाही. समुद्र, रस्ते, रेल्वे मार्गे जी वाहतूक होते तिचे नियंत्रण एखाद्या विभागाकडून होण्याची गरज आहे. त्यामुळे गुंतागुंत कमी होईल आणि व्यापार आणि निर्यात वाढण्यास मदत होईल असे वाणिज्य विभागाने म्हटले आहे.
तसे केले तर उत्पादकांच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल. त्यामुळे निर्यातदारांच्या वस्तूंचा खर्च कमी होईल आणि भारताची निर्यात वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर यामुळे ग्राहकाच्या आणि पुरवठा करणाऱ्याच्या वेळेची बचत होणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेही अशा प्रकारची सूचना केली होती. यासाठी दहा कलमी कार्यक्रम तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार वाणिज्य मंत्रालयाने हा कार्यक्रम तयार केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.