कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या दोन्ही कॉंग्रेसने आता आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली जाणार आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सलग दुसऱ्यांदा पानिपत झाले. या निवडणूकीत कॉंग्रेसला केवळ एकाच, तर राष्ट्रवादीला 5 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना-भाजपच्या महायुतीपुढे पराभव पत्करावा लागलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली.
ही बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यात आली. त्यानुसार विधानसभा निवडणूकीतही महायुतीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठका होतील. विखे-पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपत जातील, असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुनिल तटकरे, सपाचे नेते अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, आमदार हसन मुश्रीफ, बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते जयंत पाटील, गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आ. नसीम खान, बविआचे आ. हितेंद्र ठाकूर, विधानपरिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे आ. शरद रणपिसे, आ. जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई, आ. हेमंत टकले,आ. अनिकेत तटकरे आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.
मनसेला आघाडीत घेण्याबाबत निर्णय नाही – जयंत पाटील
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.