कराड तालुक्यातील सदाशिवगडावरही होणार संवर्धन मोहिम
कराड – महाराष्ट्र दिनी सातारा जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या 22 संस्था एकत्रित आल्या. या संस्थांनी रविवार दि. 12 मे रोजी जिल्ह्यातील पाच किल्ल्यांवर गडसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात केले आहे. ही मोहिम चार किल्ल्यांवर सकाळी आठ वाजता तर सदाशिवगड येथे सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व 24 किल्ल्यांवर अशा संवर्धन मोहिमा राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त युवकांनी या मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किल्ले अजिंक्यतारा, किल्ले वंदन, किल्ले सज्जनगड, किल्ले दातेगड आणि किल्ले सदाशिवगड येथे या दुर्ग संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंक्यतारा, किल्ले वंदन, सज्जनगड, दातेगड येथे सकाळी आठ वाजता मोहिमांना प्रारंभ होणार आहे. तर सदाशिवगड येथे सकाळी साडेसहाला प्रारंभ होणार आहे. किल्ले अजिंक्यतारा येथे सप्तऋषी मंदिर परिसरातील तलावाची स्वच्छता केली जाणार आहे. धर्मरक्षक राजधाना सातारा या ग्रुपकडून ही मोहिम आयोजित करण्यात आली आहे.
किल्ले वंदन येथे श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन – वंदन या ग्रुपकडून तलावातील गाळ काढण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. हेच काम रविवारच्या मोहिमेत हाती घेतले जाणार आहे. किल्ले दातेगड येथे गडावरील टाके साफ करण्याचे काम सुरू असून हेच काम सुरू ठेवले जाणार आहे. टीम दातेगडने या मोहिमेचे आयोजन केले आहे. तर राजधानी प्रतिष्ठान सातारा या ग्रुपकडून किल्ले सज्जनगड येथे स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून किल्ले सदाशिवगड येथे चिंच विहिरीतील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या “दुर्ग सातारा जिल्ह्यातील’ या समूहातील दुर्ग संस्थांनी एकाच दिवशी पाच किल्ल्यांवर आयोजित केलेल्या या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांसह अबालवृद्धांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजनकांकडून करण्यात आले आहे.