येरवड्यातील प्रकार ः नागरिक त्रस्त
येरवडा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शाहदवल बाबा चौक या मार्गावरील पदपथावर राडारोडा टाकल्याने पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजुला कचरा आणि राडारोडा नेहमीच टाकला जात असल्याचे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे. याकडे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
बांधकामाचा राडारोडा गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी टाकला जात असून ड्रेनेजसाठीचे पाइपही अग्निशमन केंद्राजवळच्या रस्त्यावर पडून आहेत. वर्दळीचा रस्ता तसेच अनेकवेळा रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाइट नसल्याने अंधारात हे पाइप दिसून येत नाहीत. त्यामुळे पायअडकून पडण्याचे प्रमाण वाढत आहे. सकाळ आणि रात्रीच्यावेळी स्थानिक नागरिक या पदपथाचा व्यायामासाठी वापर करतात. मात्र, या राडारोड्यामुळे पदपथाचा मोठा भाग व्यापला गेल्याने त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.
सतत वाहनांची गर्दी असल्याने चालताना भीती वाटते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रस्ते स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा राडारोडा दिसत नाही का, आरोग्य निरीक्षकाचे याकडे लक्ष कसे नाही, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्यावरील कचरा, सिमेंटचे पाईप, राडारोडा लवकरात लवकर हलवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.