जालना – लोकल नेते, कार्यकर्ते मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. किती लोक गेले? कोण-कोण मेलं? याचा जाब विचारत आहेत. या लोकांचा भारतीय सैन्यावर विश्वास नाही. या प्रश्न विचारणाऱ्यांनाच हेलिकॉप्टरमधून तिथे नेऊन उतरवले पाहिजे, मग त्यांना कळेल कुठे झाला सर्जिकल स्ट्राईक? देशाच्या सुरक्षेवरुन राजकारण केले जात आहे, अशी टीका महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातल्या जामखेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पंकजा मुंडे संबोधित करत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, हल्ली कोणीही उठतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोलत आहे. वर्तमानपत्राची हेडलाईन होण्यासाठी ते काहीही बरगळत आहेत. आमच्या जिल्ह्यातील लोकल नेतेही मोदींवर टीका करु लागले आहेत. या लोकांना नरेंद्र मोदी ओळखत देखील नाहीत, तरी देखील हे लोक मोदींविषयी बोलतात.
मुंडे म्हणाल्या की, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्यापेक्षा एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचे होते. मग खरं काय ते तुम्हाला कळले असते. विरोधक सातत्याने भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. यावरुन पंकजा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.