विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळण्याचा प्रयत्न
बूथ प्रतिनिधींची पळवापळवी…
लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवारांची पळवापळवी झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळाल्या. आता अशीच स्थिती मतदान केंद्रापर्यंत आल्याचे चित्र दिसत आहे. चुरशीच्या लढतीत बुथ प्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर सक्षम बुथ प्रतिनिधी देण्याची व्यवस्था करण्यात प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे.आधी पाण्याची व्यवस्था हवी…
उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत आहे. अकरानंतर घेण्यात येणाऱ्या सभा व बैठकांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी निवडणूक प्रचार प्रमुखांवर आली आहे. त्यामुळे थंड जारला मागणी वाढली आहे.
नगर – नगर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे.
नगर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारला वेग येणार आहे. असे असेल तरी सध्या उमेदवार कार्यकर्ते प्रचाराला लागले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. भाजप शिवसेना युती, कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे; मात्र प्रचाराला येण्यासाठी कार्यकर्ते कमी पडू लागले आहेत. त्याचे कारण उन्हाचा कडाका हा आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी नेमलेले कार्यकर्ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सक्रिय असतात. त्यानंतर ते गडप होतात ते सायंकाळीच हजर होत आहेत. याबद्दल विचारणा केल्यावर दुपारच्यावेळी लोकही घर बंद करून बसत असल्याने भेटत नसल्याचे कारण सांगितले जात आहे.
उन्हाच्या कडाक्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारकांचा दौरा मागताना सकाळी किंवा सायंकाळची वेळ मागितली जात आहे. दुपारी उन्हामुळे लोक सभांना येत नसल्याचे सांगितले जात आहे. सभा व बैठकांच्या रिकाम्या खुर्च्यांचे विरोधक भांडवल करतील या भीतीने दुपारची वेळ टाळा असे सांगितले जात आहे. शहरात सभा व बैठकांना गर्दी आणण्याची जबाबदारी नगरसेवकांवर दिली जात आहे. याचबरोबरीने बुथ प्रतिनिधींची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते व्यस्त दिसत आहेत.