केंद्रपारा (ओडिशा) – ओडिशा हे ‘पान’ (पांडियन, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन पटनायक) द्वारे चालवले जात आहे. या राज्यात भाजप आणि बिजु जनता दलाची एकमेकांशी साठगांठ आहे. त्यातून ओडिशाची दुर्दशा झाली असून आता या राज्यात कॉंग्रेसला संधी देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते आज येथे एका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.
वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले, तुम्ही लोकांनी पुरेसे पान खाल्ले आहे, आता ओडिशातील काँग्रेस सरकारची वेळ आली आहे. ओडिशात भाजप-बीजेडीने सर्वांना हे पान खाऊ घातले आहे.
पंतप्रधान मोदी २२-२५ लोकांसाठी सरकार चालवतात, त्याच पद्धतीने नवीन पटनाईकही काही निवडक लोकांसाठी राज्य सरकार चालतात. या लोकांनी तुमची सर्व संपत्ती लुटली आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी या पक्षांनी बळकावल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच तेलंगणात भाजपने बीआरएसशी सांठगांठ केली होती. त्यामुळे तेथे बीआरएसचा पराभव झाला होता. आता ओडिशातही तसेच होईल असे ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या पाच न्याय आणि २५ हमींचा उल्लेख केला.
ते म्हणाले की आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही गरीब महिलांच्या खात्यावर दरवर्षी एक लाख रूपयेजमा करू, केंद्र सरकारमधील सर्व ३० लाख रिकाम्या जागा कालबद्धपद्धतीने भरू, पदवीधर आणि पदविकाधारकांनाही एक वर्षासाठी येाजना राबवून त्यांनाही एक लाख रूपयांची मदत करू असे त्यांनी नमूद केले.
आम्ही तेलंगणा आणि कर्नाटकात मतदारांना दिलेल्या हमी पुर्ण केल्या आहेत अशाच हमी योजना आम्ही ओडिशात राबवू अशी ग्वाही त्यांनी दिली.