Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेर मुंबईने गेल्या ८ वर्षांचा दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत विदर्भचा पराभव करून ४२ व्यांदा विजेतेपद पटकावले. यापूर्वी मुबंईने २०१५-१६ मध्ये विजेतेपद मिळवले होते. मुंबईचा संघ ४८ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या डावात १०५ धावांत डाव संपल्यानंतर न डगमगता विदर्भने दुसर्या डावात मात्र, कडवी लढत दिली. मात्र, तरीही त्यांना १६९ धावांनी पराभव पत्करावा लागला.
𝑹𝒆𝒊𝒈𝒏𝒊𝒏𝒈 𝑪.𝑯.𝑨.𝑴.𝑷.𝑰.𝑶.𝑵.𝑺 🏆
MCA proudly celebrates another #RanjiTrophy triumph 🎊#MCA #Mumbai #Wankhede #BCCI #Champions #RanjiTrophyFinal #Final pic.twitter.com/Lrm3Uyz0Kz
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 14, 2024
या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व होते. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ ३६८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ गडी गमावून २४८ धावा केल्या होत्या.
यानंतर संघाला कर्णधार अक्षय वाडकरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात विदर्भ संघाने एकही गडी गमावला नाही, मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई संघाने दमदार पुनरागमन करताना प्रथम अक्षय वाडकरला वैयक्तिक १०२ धावांवर बाद केले. कडवी लढत देत असलेल्या हर्ष दुबेलाही ६५ धांवर बाद केले. त्यानंतर मुंबईने विजयाच्या दिशेने आगेकूच केली. विदर्भाचा दुसरा डाव ३६८ धावांवर आटोपला. मुंबईकडून तनुष कोटियनने ४ तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने प्रत्येकी २ बळी घेतले. शम्स मुलाणी आणि धवल कुलकर्णी यांनीही प्रत्येकी १ बळी घेण्यात यश मिळविले.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली या रणजी मोसमात मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. एकात पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बडोदाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अनिर्णित राहिला तेव्हा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला. जिथे त्यांनी तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव केला. आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मुंबईसाठी या रणजी मोसमात सर्वाधिक धावा भूपेन लालवानीने केल्या. त्याने १० सामन्यांत ५८८ धावा केल्या. मोहित अवस्थीने सर्वाधिक बळी घेतले. त्याने ८ सामन्यात ३५ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई पहिला डाव – सर्वबाद २२४ धावा. विदर्भ पहिला डाव – सर्वबाद १०५ धावा. मुंबई दुसरा डाव – सर्वबाद ४१८ धावा. विदर्भ दुसरा डाव – १३४.३ षटकांत सर्वबाद ३६८ धावा. (अक्षय वाडकर १०२, करुण नायर ७४, हर्ष दुबे ६५, अमन मोखाडे ३२, अथर्व तायडे ३२, ध्रुव शौरी २८, तनुष कोटियन ४-९५, मुशीर खान २-४८, तुषार देशपांडे २-५३).