Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final, Day 4 Stumps :- – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या मंबईचा विजय पाचव्या दिवसापर्यंत लांबणीवर पडला. पहिल्या डावात 105 धावांवर गडगडलेल्या विदर्भच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र कडवी लढत दिली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भने आपल्या दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 248 धावा केल्या आहेत. ते अद्याप 290 धावांनी पिछाडीवर आहेत. जिद्दी अर्धशतकवीर करुण नायरची खेळी विदर्भचा पराभव टाळू शकणार का याचे उत्तर पाचव्या दिवशी मिळेल मात्र, सध्यातरी सामना मुंबईच जिंकणार व 42 वे विक्रमी विजेतेपद पटकावणार असेच चित्र दिसत आहे.
That’s stumps on Day 4 in the #RanjiTrophy Final! 🏆
A terrific fight with the bat from Vidarbha as they reach 248/5 👏 👏
Mumbai need 5⃣ wickets to win while Vidarbha need 290 runs on the final day 🙌
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXXPa2#MUMvVID | #Final | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Kdw9j4Y4f4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2024
तत्पूर्वी, मंगळवारच्या बिनबाद 10 धावांवरुन पुढे खेळ सुरु झाल्यावर ध्रुव शौरी व अथर्व तायडे यांनी अर्धशतकी सलामी दिली. तायडे 32 तर शौरी 28 धावांवर बाद झाले. त्यानंतर अमन मोखाडेने करुण नायरला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. स्थिरावलेला मोखाडे 32 धावांवर परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या यश राठोडने साफ निराशा केली. मात्र, नायरच्या साथीला आक्षय वाडकर आला व या जोडीने भक्कम फलंदाजी करत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. या जोडीने 90 धावांची भागीदारी केली.
दरम्यान नायरने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तो सुरेख फलंदाजी करत होता. दिवसातील पाच षटकांचा खेळ बाकी असतानाच तो 74 धावांवर बाद झाला. त्याने तब्बल 220 चेंडू खेळताना केवळ 3 चौकार मारले. नायर बाद झाल्यावर अक्षय वाडकरने आपले अर्धशतक साकार केले. त्याने हर्ष दुबेसह संघाचा डाव पुन्हा एकदा नव्याने सावरायला घेतला. या जोडीने 25 धावांची अखंडीत भागीदारी करत संघाचे दिवसअखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही.
खेळ थांबला तेव्हा अक्षय वाडकर 91 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 56 धावांवर खेळत आहे. तर हर्ष दुबेने एक चौकार व एक षटकार फटकावताना 10 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या आहेत. ते अद्याप 290 धावांनी पिछाडीवर असून अखेरच्या दिवशी ते पराभव कीती लांबणीवर टाकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई पहिला डाव – सर्वबाद 224 धावा. विदर्भ पहिला डाव – सर्वबाद 105 धावा. मुंबई दुसरा डाव – सर्वबाद 418 धावा. विदर्भ दुसरा डाव – 92 षटकांत 5 बाद 248 धावा. (करुण नायर 74, अथर्व तायडे 32, अमन मोखाडे 32, ध्रुव शौरी 28, अक्षय वाडकर नाबाद 56, हर्ष दुबे नाबाद 11, मुशीर खान 2-38, तनुष कोटियन 2-56).