पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह लेखक, कवी, निवेदक उद्धव रेवणसिद्ध कानडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री उशीरा लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कानडे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि काही दिवसांपासून त्यांच्यावर सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कानडे यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील (त्यावेळचा उस्मानाबाद) वडगाव सिद्धेश्वर येथे १४ जुलै १९५८ मध्ये झाला, त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी मराठी आणि हिंदी विषयात प्राविण्य मिळवून राष्ट्रभाषा पंडित ही पदवी मिळवली.
कानडे हे गेली चार दशके, साहित्यिक, कवी म्हणून परिचित आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून वेगळा ठसा उमटवला होता. १९९४ सालापासून अ. भा. मराठी साहित्य संमेलनात आणि १९९२ पासून महाराष्ट्र सरकारच्या कामगार साहित्य संमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. दलित, मुस्लिम, ग्रामीण, ग्रामजागर या साहित्यसंमेलनातही त्यांनी उल्लेखनीय सहभाग दिला आहे.
मसापचे कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांना विविध कवी आणि साहित्यकांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. केशरमाती, मानवदरा, हृदयरंग, अस्वस्थायन, आम्ही घामाचे धनी हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले होते. तर केशरगंध (ललित) यासह जुनं गाव नवी वाट, किलकारी, ही आसवांची कहाणी, पाठीवरचा माणूस या त्यांच्या कांदबऱयाही प्रसिद्ध झाल्या होत्या.
एक सामान्य बळी हे नाटक आणि काळीजमोड हा कथासंग्रह जंगलचक्र, घामाचं गाणं, खोटं सत्य, खडकपाटी या एकांकिका त्यांनी लिहिल्या होत्या. दूरदर्शन आणि आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कवी होते. त्यांनी अनेक कवितांचे कार्यक्रम सादर केले. त्यांनी अनेक कार्यक्रमांत निवेदनाची जबाबदारीही सांभाळली आणि अनेक दिग्गजांच्या मुलाखतीही घेतल्या. राज्य सरकारचा मामा वरेकर पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, कवी रा. ना. पवार साहित्य पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.