Eknath Shinde – गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग किंवा श्रीमलंगगडाचा वाद सुरू आहे. ही जागा कोणत्या धर्मियांची आहे याबाबत अद्याप योग्य संशोधन किंवा खुलासा झालेला नाही. लोकांच्या मलंगगड मुक्तीच्या भावनांची मला कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य आता मुख्यमंत्री शिंदेंनी केलेले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हाजी मलंग की श्रीमलंगड आहे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
यासंदर्भात संशोधन सुरू आहे आणि दोन्ही धर्मियांकडून वेगवेगळे दाखले देखील दिले जातात. या जागेचा उल्लेख हाजी मलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतो. गेली अनेक वर्षे या प्रार्थना स्थळाबाबतीत चर्चा, आंदोलन आणि वाद सुरू आहेत. त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.
मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केले होते. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचे हे आंदोलन अजूनही चालू आहे.
मंगळवारपासून ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे. या हरिनाम सप्ताहमध्ये वारकऱ्यांनी पुन्हा श्री मलंगडाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलून दाखवला. ‘श्री आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे’ अशी घोषणाबाजी या कार्यक्रमात करण्यात आली.
वाद काय व का?
श्री मलंगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते, नैवेद्य अर्पण केला जातो.
तर दुसरीकडे १३ व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू सांगते. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. ८० च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे