मुंबई/नागपूर – केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचे आवाहन केले. हिट अँड रन प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असे आश्वासन केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात आले.
त्यामुळे मध्यरात्रीपासून ट्रक चालकांनी संप मागे घेतला. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील अनेक शहरात सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली होती.
ट्रान्सपोर्ट युनियनने जरी आपला संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी काल दिवसभर लोकांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर अत्यंत मर्यादीत साठा आहे.
नागपुरातील ७५ टक्के पंप कोरडे
नागपूर शहरातील ७५ टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक झाले आहेत आणि बुधवारी रात्रीपर्यंत उर्वरित २५ टक्के पेट्रोल पंप ही कोरडे होण्याची भीती आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इंधन असेपर्यंत सेवा देणार- स्कूल बस संघटना
मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे. मुंबईत एकूण सहा हजार ते महाराष्ट्रात ४० हजार स्कूल बसेस आहेत.
भाज्यांची आवक घटली
वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली आहे. महाराष्ट्रात ४०० ते ४२५ गाड्यांची आवक होते, मात्र संपामुळे दोन दिवस १०० ते १५० गाड्यांची आवक कमी झाली आहे.. भाजीपाला दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.