नागपूर -कॉंग्रेससाठी पुढील १०० दिवस द्या, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. कॉंग्रेसने केंद्रात सरकार स्थापन करावे यासाठी पक्षकार्याला प्राधान्य द्या. पक्षकार्यासाठी रजा घेत असल्याचे कुटूंबीयांना सांगा, असे साकडे त्यांनी कार्यकर्त्यांना महारॅलीत घातले.
लोकसभा निवडणूक अवघ्या ३-४ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याचा संदर्भ देऊन रेड्डी यांनी पुढील १०० दिवस कॉंग्रेससाठी आणि देशासाठी महत्वाचे असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. प्रत्येक औषधाला एक्स्पायरी डेट असते. त्याचप्रमाणे मोदींचे औषधही आता चालणार नाही, असा दावा त्यांनी केला.
कॉंग्रेसला सातत्याने लक्ष्य करत असल्याबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. पं.जवाहरलाल नेहरू पंतप्रधान बनले त्यावेळी देशात साध्या सुईचेही उत्पादन होत नव्हते.
मात्र, कॉंग्रेसने दिलेल्या नेतृत्वामुळे आता देशात सुईपासून विमानापर्यंत सर्व बाबींचे उत्पादन होते, असे त्यांनी नमूद केले. माजी पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या कॉंग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.