रायपूर – छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. या राज्यात मंत्रिमंडळाची रचना करताना पक्षाने नवा फॉर्म्युला वापरला आहे. सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्र्यांवरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ याच राज्यात नाही तर मध्य प्रदेश आणि राजस्थानातही भाजपने हाच फॉर्म्युला वापरला आहे. मात्र कॉंग्रेसने आता हाच मुद्दा उपस्थित केला आहे. दोन दोन उपमुख्यमंत्रिपदे अमान्य असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
छत्तीसगढमध्ये आदिवासी नेते विष्णु देव साय हे मुख्यमंत्री आहेत. तर अरूण साव आणि विजय शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. या तिघांचा १३ तारखेला शपथविधी झाला आहे. त्याला माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अकबर यांनी आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही कधीही मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही. या मंत्र्यांकडून केले जाणारे कार्यही घटनाबाह्य असेल असे अकबर यांचे म्हणणे आहे.
ते म्हणाले की घटनेत अशी तरतूद आहे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि अन्य मंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. कोणत्याही राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. घटनेत उपमुख्यमंत्री हे पदच नाही त्यामुळे त्या पदाच्या गोपनीयतेच्या शपथेचेही काही औचित्य नाही. कायद्याच्या दृष्टीने त्या पदाची शपथ शून्य आहे. घटनेच्या तिसऱ्या सूचीत याबाबत पुरेसी स्पष्टता करण्यात आली आहे.
त्यांना डी. के. शिवकुमार यांची शपथही अमान्य आहे का?
कॉंग्रेस नेत्याच्या या आक्षेपाला भारतीय जनता पार्टीने प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटक या राज्यात कॉंग्रेसच्या सरकारमध्ये डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असल्याकडे भाजपने लक्ष वेधले आहे. भाजपचे माध्यम प्रभारी अमित चिमनानी म्हणाले की, मोहम्मद अकबर स्वत:ला संसदेच्या परपरेचे ज्ञानी समजतात. त्यांना भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांची शपथ अमान्य आहे.
मग त्यांना कर्नाटकातील उपमुख्यमंत्र्यांचीही शपथ अमान्य आहे का? अकबर यांचा निवडणुकीत पराभव झाला असल्यामुळे अशी विधाने करून ते स्वत:ला माध्यमांमध्ये चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्वीही अशी विधाने करून त्यांनी स्वत:ची आणि आपल्या पक्षाच्या अडचण करून ठेवली होती.