पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून तर शिरुरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, जळगावमधून एकनाथ खडसे यांचे नाव सुचविले आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुध्दा लवकरच अंतिम करू, असेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पदवाटप कार्यक्रमानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की, जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी विद्यमान खासदार हे आमच्या पक्षाचे आहेत तेथील उमेदवार हे आमच्या पक्षाचे असतील. बाकी जागेवरील उमेदवार मी जाहीर करणे सोयीचे नाही.
शिवसेनेचे आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू होणार आहे. ही सुनावणी ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी होत आहे, आमची सुध्दा सुनावणी ऑनलाइन घेण्याची मागणी आहे. ऑनलाइन सुनावणी झाली तर बरे होईल विधानसभा अध्यक्षांवर आक्षेप घेता येणार नाही. दोन्ही बाजू कळतील, तसेच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेणे सोपे होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
शरद पवार गटातील काही आमदारांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखल्याच्या बाबत प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, “याबाबत काही आमदारांनी माझ्याकडे ही तक्रार केली आहे. आमदारांना आधी निधीची मागणी करायला सांगितले, मतदारसंघासाठी कामे सुचविले. आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारने ही अडचण दूर कराव्यात, अशी अपेक्षा आहे.’
दुष्काळ निवारणासाठी कार्यवाही व्हावी
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे, मात्र हे सरकार फारशी हालचाल करताना दिसत नसल्याची टीका पाटील यांनी केली. ते म्हणाले की, दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष कार्यवाही होईल, असे वाटत नाही. अनेक धरणात कमी पाणीसाठा आहे. पुढचे वर्ष कसे काढायचे हे आव्हान आहे. सरकारकडून दुष्काळ निवारणार्थ नियोजन बैठक अथवा निर्णय होताना दिसत नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. दुबार पेरणीचे संकट आहे, मात्र सरकार इव्हेंटमध्ये गुंतली आहे.