मुंबई – ठाण्यातील मीरा रोड येथील गीता नगर परिसरातील हत्या कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, या हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मनोजने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घातले. पोलिसांना परिसरातील लोकांनी कळवताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आणि मनोजला अटक केली. श्रद्धा वालकर प्रकरणा सारखीच आहे असेही म्हटले आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. अशात सुप्रिया सुळे यांनी या प्रकारणावर ट्विट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की,’मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे.’ असं ट्विट करत सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे, यावर आता भाजप नेत्या चित्र वाघ यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
चित्र वाघ यांचे ट्विट
सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं..
श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच ! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही,मोठठ्या ताई…