डोर्लेवाडी, {नवनाथ बोरकर} – बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ६९.४८ टक्के मतदान झाले असून यामध्ये खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात पहायला मिळाली.
आता त्यांच्यासह इतर ३६ उमेदवाराचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून चार जूनला काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या सहा मतदारसंघाचा समावेश आहे.
सात मे रोजी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात जेष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आमने-सामने होत्या.
मात्र, खऱ्या अर्थाने या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच थेट सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ६९.४८ टक्के मतदान झाले.
यामध्ये बारामती शहरात घड्याळाची टिकटिक तर बारामतीतल्या ग्रामीण भागामध्ये तुतारीचा आवाज घुमला असल्याची चर्चा सध्या चौका चौकामध्ये सुरू आहे.
यात डोर्लेवाडी पंचायत समिती गणामध्ये डोर्लेवाडी व झारगडवाडी, गावात एका समाजातील घटकाने तुतारी वाजवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पंचायत समिती गणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले.
यात डोर्लेवाडी गणातील सोनगाव ( इनामपटट्टा)- ७६ %, सोनगाव गाव -७५ %, ढेकळवाडी -७५ %, खताळपट्टा- ७७ %, डोर्लेवाडी – ७२ %, झारगडवाडी -७५%, आणि सांगवी गणातील मेखळी -७६ %, घाडगेवाडी – ८०% असे मतदानाची टक्केवारी आहे.
दोघांचीही प्र्रतिष्ठा पणाला…
शरद पवार यांच्याशी फारकत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. अजित पवार यांनी चाळीस आमदारांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत पक्ष आणि चिन्ह स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले.
यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थापन करत लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करून महाराष्ट्रात पुन्हा उभारी घेण्याचा संकल्प केला आहे.
या लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात कोणता पवार वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून यामध्ये दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.