औंध -बाणेर-बालेवाडी या भागात सध्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हे काम करताना गणराज चौक येथे रस्त्याकडेला दुकानांसमोरच खोदकाम करीत मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या ठिकाणी कोणतेही काम झालेले नसल्याने या रस्त्याकडेच्या सर्वच्या सर्व दुकानदारांच्या व्यावसायावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसला आहे. हे काम तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी या भागातील व्यावसायिकांनी मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत व्यावसायिक माणिक एरंडे म्हणाले की, या खड्ड्यांमुळे ग्राहकांना दुकानात येताना अडचण होत आहे. अनेकदा ग्राहक दुकानात येतच नसल्यामुळे याचा परिणाम व्यवसायावर होत असून आर्थिक घडी विस्कळित झाली आहे.
बाणेर येथील किरण सायकर यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यांपूर्वी खड्डा खोदण्यात आला आहे, त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधीत यंत्रणेने येथील काम तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.
गणराज चौकात गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. या आठवड्यात त्यावर वॉल्व्ह बसविला जाणार आहे तसेच इतरही तांत्रिक अडचणी असून त्याचे निराकरण करावे लागत असल्याने कामाला वेळ लागतो आहे. तरी हे काम त्वरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– उमेश मल्लावत,कार्यकारी अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण