संगमनेर – आपला तालुका हा आदर्श संस्कृतीचा तालुका आहे. विकासातून पुढे जातो आहे. मात्र, हे काही लोकांना पाहवत नसल्याने हेतू पुरस्सर विकासात आडकाठी घालण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहे. संधी शोधून तालुक्याचे वातावरण बिघडविण्याचे काम ही मंडळी करत आहे. तालुक्यातील चैतन्यमय व सुकून असलेले वातावरण टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांतर्फे आयोजित जलपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, ऍड. माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, संपत डोंगरे, इंद्रजित थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, आर. बी.राहणे, कृती समितीचे ज्ञानेश्वर वर्पे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, बेबीताई थोरात, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, सुधाकर जोशी, जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
या वेळी आ. थोरात म्हणाले की, आजचा दिवस हा तालुक्यातील दिवाळीचा व आनंदाचा दिवस आहे. निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे तळेगाव भागात येणे हे पिढ्यान पिढ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. या निमित्ताने ज्यांनी या कामासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे ऋण व्यक्त होणे गरजेचे आहे. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबवताना प्रकल्पग्रस्तांना अकोले व संगमनेर तालुक्यात शासकीय जमिनी दिल्या. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचा शेरा उठवला. शेजारी तालुक्यातील कोणीही या कामी जमिनी दिल्या नाहीत. सन 2012पर्यंत भिंत पूर्ण करून बोगद्यांची कामे मार्गी लावली.
सन 2014 ते 19 काम थंडावले होते. सन 2019 नंतर पुन्हा कामाला गती दिली. करोना संकटातही रात्रंदिवस काम सुरू ठेवले. ऑक्टोबर 2022मध्येच पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. श्रेयासाठी कधीही आपण लढलो नाही. काम कोणी केले हे सर्व जनतेला माहिती आहे. पाणी आल्याने जीवनाचे सोने झाले आहे.
माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त शेतकरी वाट पाहत होते. तो दिवस आ. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वातून आज उगवला आहे. या वेळी कानवडे, डॉ. थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर रणजीत सिंह देशमुख यांनी आभार मानले.
आ. थोरात यांची दोन किलोमीटर मिरवणूक
तळेगाव गटात निळवंडे धरणाचे पाणी आल्याने दुष्काळी गावांतर्फे आ. बाळासाहेब थोरात यांची दोन किलोमीटर सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा रोषणाई करून ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत आ. थोरात यांचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले.