पिंपरी – महावितरण विभागाकडून पिंपरी चिंचवड शहरात मागील काही महिन्यांपासून मेन्टन्सची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी भूमिगत केबल, पोलवरील विद्युत तारा, खांब, डीपी बॉक्स यांच्या दुरुस्तीची कामे करणे बंधनकारक आहे. ही कामे करण्यासाठी शहरातील प्रत्येक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. परंतु अवकाळी पाऊस आणि वादळाने शहरातील महावितरण आणि महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे दर्शन नागरिकांना घडले आहे.
रविवारी सायंकाळी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत व इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. या पावसात चिखली येथील मोरेवस्ती परिसरातील वाघू साने चौक ते चिंचेचा मळा या मार्गावरील विद्युत खांब कोसळल्याने रात्री पाच-सहा ते मध्यरात्री बारापर्यंत म्हणजे तब्बल सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे चिखली भागातील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती, अष्टविनायक चौक आदी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. येथील कामगार भोसरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी आदी भागात तीन शिपमध्ये काम करतात. रात्री घरी आल्यानंतर लाइट नव्हती. कधी येईल याचा तपास नव्हता. बाहेर पावसाचे वातावरण आणि घरात गर्मी यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मोरेवस्ती येथील विद्युत खांब उभा करण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री बारा वाजता पूर्ण करून वीजपुरवठा पुर्ववत केला. आज दुपारी नवीन विद्युत खांब आणून टाकण्याचे काम सुरू आहे.
मोरेवस्ती भागात रविवारी (दि. 4) वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने विजेचा खांब कोसळून चिखली परिसरातील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. हा प्रकार वाघू साने चौकाकडून मोरेस्तीत येणाऱ्या मार्गाजवळ घडला. हा रहदारीचा मार्ग आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी व्यवस्थित काम करत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. मेंटनेन्सच्या कामावेळीच पाहिले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. त्यामुळे महावितरणने शहरातील व मोरेवस्ती भागातील विद्युत खांबांची पाहणी करून कुजलेल्या खांबांची बदली करावी. विनाकारण नागरिकांच्या जिवाशी खेळू नये.
– पांडुरंग साने, सामाजिक कार्यकर्ते.
कुजलेल्या लोखंडी खांबाकडे दुर्लक्ष
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. बहुतांश भागात कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला. परंतु मागील काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह येणारा पाऊस महावितरणच्या कामकाजाची चांगलीच पोलखोल करत आहे. महावितरणने विद्युत खांब कुजून देखील तो नवीन टाकण्याचे काम केले नाही. जेव्हा वादळात तो खांब मोडून पडला तेव्हा महावितरण जागे झाले. मग ही देखभाल दुरुस्ती नेमकी कशाची करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
वादळी पावसाचा महावितरणला फटका
अवकाळीच्या पहिल्या पावसात भोसरी विभागातील बहुतांश फीडर ना दुरुस्त होऊन बंद पडले होते. त्यामुळे शहर काही तास अंधारात राहिले. मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पडत आहे. त्यामुळे भूमिगत केबलच्या जॉइंडमध्ये पाणी जाऊन केबल नादुरुस्त होत आहेत. तर ज्या ठिकाणी विद्युत खांबावरून तारा ओढून ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात आलेला आहे ते खांब व तारा तटून पडण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे.