देहुगाव -श्री संत तुकाराम महाराज 338 वा आषाढ़ी पायी वारी सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी जाणाऱ्या तुकोबारायांची पालखीला झळाळी देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अतिशय जलद गतीने उर्वरित कामे करण्यात येत आहेत. श्री संत तुकाराम महाराजांची चांदीची पालखी, चांदीचा रथ आणि पूजेसाठी लागणाऱ्या चांदीच्या साहित्यांना झळाळी (चांदीचा मुलामा) देण्याची सेवा पिंपरी गाव येथील प्रसिद्ध घनश्याम गोल्ड यांच्या वतीने सोमवारी (दि.5) रात्री उशीरा पर्यंत पूर्ण करण्यात आली.
घनश्याम गोल्डचे कुशल वर्मा यांच्या देखरेखी मध्ये त्यांच्या 5 मुस्लिम कारागिरांनी धार्मिक साहित्य पालखी रथ व आणि पालखीला झळाळी देण्याचे काम केले. कमर महमद हुसेन आत्तार, इस्माइल युसुब आत्तार , महमद हूसेन युसुब आत्तार, शहाजान जब्बार आत्तार आणि उमर महमद हुसेन आत्तार अशी या मुस्लिम बांधव कारागिरांची नावे आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखी चांदीचा रथ, पालखी, श्री संत तुकोबांचा मुखवटा, पादुका, गरुड़ टक्के, अब्दागिरी, चोपदाराचे दंड, पाट, पूजेचे ताट, पळी, पात्र,पंचाआरती, समई, छत्री, श्रीं.ची चांदीचे आभूषणे तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील महिरप, मेघडंबरी, शेषनाग, मखर, चौकट, दरवाजे आदींना चांदीची झळाळी देण्यात आली.
झळाळी देण्यासाठी याचा केला वापर चिंचेचे पाणी, लिंबू, रिटा, वॉशिंग पावडर, लोखंडी तारांचा ब्रश, केमिकल्सचा वापर करून झळाळी देण्यात आली.