मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सविस्तर तपास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. मात्र, आता त्यांच्या या विधानावरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
राहुल नार्वेकर हे भाजपा आमदार असून ते पक्षांतर करून भाजपात आले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचं वावडं नसेल, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांकडून न्याय निकाल येणार नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावत,“तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाहीये. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की ती तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिली आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही”, असे झिरवळ म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, एवढंच सांगितलं आहे. त्यामुळे नेमकी कालमर्यादा नसलेला हा निकाल नेमका कधी येणार? याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. त्यासंदर्भात बोलताना झिरवळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “लवकरात लवकर’ ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातली भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येतं. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असतं”, असे झिरवळ म्हणाले.