फलटण – पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. फलटण तालुक्यामध्ये वाठार निंबाळकर येथे त्यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची बांधावर जाऊन डाळिंबावर आलेल्या तेल्या, मररोग व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या “लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते व राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून त्यांनी आपण राजीनामा माघारी घेत असल्याचे जाहीर केले व पुन्हा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.
त्यानुसार आज त्यांनी आपल्या कामाला सुरवात केली. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटले होते. तसेच प्रमुख नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. याबाबत समिती नेमून शरद पवार यांनी दिलेला राजीनामा नामंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राजीनामा माघार घेत असल्याचे जाहीर करून
सार्वजनिक जीवनात पुन्हा जोमाने सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील प्रगतशील शेतकरी व डाळिंब उत्पादक चंद्रकांत अहिरेकर या शेतकऱ्याच्या डाळिंब बागेस भेट देऊन डाळिंब पिकावरील तेल्या, मर रोग व अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना व उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे, उद्योजक नंदूभाऊ नाळे, वाठार निंबाळकर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.