मुंबई : शिवसेना (ठाकरे गट ) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावमध्ये एक सभा घेतली या सभेत त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर सडकुन टीका केली होती. यावेळी त्यांनी सत्ताधारी गटातील आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका करत मागच्या वर्षी एक कांदा ५० कोटींना विकला गेला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच टीकेला आता सुहास कांदे यांनी सडेतोड उत्तर देत ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. एकेकाळी ठाकरे घराण्याचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत “आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा कांदे यांनी केला.
सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांना ना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते ना त्यावेळी कोणतेही अधिवेशन सुरू होते. असे असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. याच्या मागे मोठे कारण होते ते म्हणजे आपले मेहुणे श्रीधर पाटणकर यांना वाचवण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार सुहास कांदे यांनीही पलटवार केला. म्हणाले, ‘या आरोपांची चौकशी करण्यासाठी माझी नार्को टेस्ट झाली पाहिजे. माझ्यासोबत उद्धव ठाकरेंचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. याशिवाय मी ज्या कंत्राटदारांची नावे घेतो त्यांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. कोण, किती पाण्यात आहे हे कळेल?. कांदे पुढे म्हणाले की, श्रीधर पाटणकर यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच त्या काळात उद्धव ठाकरेंनी किती लोकांना फोन केला, किती लोकांनी मध्यस्थी केली. या सर्व बाबींचीही चौकशी व्हायला हवी.अशी मागणी यावेळी कांदे यांनी केली.
दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी श्रीधर पाटणकर यांच्या घरावर छापा टाकला होता. तेव्हापासून पाटणकरांच्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे हे अस्वस्थ होते. त्यानंतर सत्तांतराचे नाट्य समोर आले आणि आपल्या म्हेव्हण्याला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली, असा आरोप कांदे यांनी केला आहे.