सातारा – सामान्य जनतेचे काम जर तुम्ही करणार नसाल तर “नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे तुम्हाला लाठीच हाणावी लागेल. एक महिन्यात प्रशासनात सुधारणा न झाल्यास प्रशासनाच्या केबीनमध्ये घुसुन जाब विचारु, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी जिल्हा प्रशासन व प्रशासनात दुट्टपी भूमिका घेत असलेल्या अधिकाऱ्यांना लाठी मोर्चा काढत दिला.
जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात काढण्यात आलेल्या लाठी मोर्चाप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार शिंदे बोलत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी जोरदारपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरुन सरकार, प्रशासनावर आपल्या भाषणातून ताशेरे ओढले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता डोक्यावर घेते पण लोकांच्यावर अन्याय कराल तर त्याच अधिकाऱ्यांना डोक्यावरुन फेकून देते.
एका बाजूने कारभार करु नका, असा इशारा शिंदे यांनी दिला. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेबांचा आहे. या जिल्ह्याला संस्कृती, परंपरा आहे. ती जर मोडणार असाल तर हा फक्त इशारा मोर्चा आहे. पुन्हा जनता तुमच्या केबीनमध्ये घुसून तुम्हाला जाब विचारतील. मी 32 वर्ष राजकारणात आहे.
कधी अधिकाऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. आता बोलावं लागतयं. हे अधिकारी सुधारले नाहीत तर आम्हाला त्यांना वठणीवर आणावे लागेल, यासाठी तर हा लाठी मोर्चा काढला असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. “पन्नास खोके एकदम ओके’, “पवार साहेबांचा विजय असो’, “आता या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय’, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘, अशा घोषणा परिसर दणाणून काढत आणि “सुशासन नव्हे तर ढिम्म प्रशासन, एककलमी कार्यक्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, अशी घोषवाक्य असलेल्या पाट्या घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला.
येथील बॉम्बे रेस्टॉंरट चौक, सातारा येथे कोरेगाव, खटाव, सातारा या तालुक्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते सकाळी दहा वाजल्यापासूनच एकत्र येत होते. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकजणाच्या डोक्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची टोपी, हातात राष्ट्रवादीचा झेंडा अन् घोषणांचे फलक देण्यात आले होते. मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चामध्ये आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, अतुल शिंदे, युवती आघाडीच्या स्मिता देशमुख आदी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा परिषद चौकात पोहचल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हा बॅंकेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुन्हा मोर्चात सहभागी झाले होते.