मुंबई – राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर, आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अश्यातच, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे’. असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. यावेळी पवार माध्यमांशी संवाद साधत होते.
नेमकं शरद पवार काय म्हणाले…
शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले, “केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे’, असं शरद पवार म्हणाले.