अमित डोंगरे
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला भारतात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अंग काढून घ्यावे लागले. अर्थात हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. गेले काही महिने आपण तेच पाहात आहोत. मग आता तरी त्याच्याशिवाय खेळण्याची सवय करायला हवी.
बुमराहला गेल्या मौसमात पाठीदुखीचा त्रास झाला व त्यावर उपचार करण्यापासून ते संघात परतण्यापर्यंत रोज नवनवे खुलासे आलेले आपण पाहिले आहेत. आताही तेच घडले आहे. बीसीसीआयने या चारही कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचे सांगितले व भारतीय संघाला म्हणे त्याचा धक्का बसला.
वाट्टेल ते बोलल्यावर सगळ्यांनाच ते खरे वाटते. खरेतर गेल्या मौसमापासून बुमराहला ज्या मालिकांमधून किंवा स्पर्धांमधून दुखापतीमुळे खेळता आले नाही त्यात भारतीय संघाने पराभवच स्वीकारले असे नाही तर उलट विजयाची टक्केवारीही जास्त आहे. म्हणजेच बुमराह संघात नाही हे सचिन तेंडुलकर संघात नसल्यासारखे वाटून घेण्याचे कारण नाही. आता तर भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात बुमराहशिवाय खेळण्याची सवय करणे गरजेचे आहे.
एकतर त्याची गोलंदाजी शैली अवे फ्रॉम बॉडी आहे, त्यातही तो क्रीझच्या वाइडला जाऊन चेंडू टाकतो म्हणजेच ही शैली काहीशी राउंड आर्मही वाटते. अशी गोलंदाजी करताना बुमराहच्याच नव्हे तर प्रत्येक गोलंदाजाच्या पाठीवर, स्नायूंवर तसेच मणक्यांवर ताण येतो. मुळातच बुमराहची शैली कॉपीबुक नसल्याने तो यॉर्कर चांगले टाकू शकत असला तरीही त्यासाठी सातत्याने तंदुरुस्त असणेही गरजेचे आहे.
आता बुमराह या कसोटी मालिकेत खेळणार नाही तसेच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेलाही तो मुकणार आहे. काय तर म्हणे यंदा भारतातच होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी तो ताजातवाना राहिला पाहीजे. हे असे चोचले आपल्याकडेच चालतात. परदेशी संघ अशा परिस्थितीत प्रमुख गोलंदाजाच्या अनुपस्थितीतही नवोदितांच्या कामगिरीवर सामने जिंकतात णग आपणही आता बुमराहशिवाय खेळण्याची मानसिक तयारी केली पाहिजे.