पिंपरी, – हिंजवडीतील नामांकित आयटी कंपन्यांनी तब्बल 200 फ्रेशर्स (नवशिकाऊ) तरूणांना नोकरीसाठी नियुक्तीपत्र देऊनही कामावर रूजू केलेले नाही. फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजने केलेल्या महिन्याभरातील गुगल सर्व्हेत हे उघड झाले आहे. तक्रारी करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून नियुक्तीबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यास या तरूणांना दाद देखील दिली जात नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत आता शासनाचे दरवाजे ठोठावून न्याय मागण्यात येणार आहेत.
जगभरातील नामांकित आयटी कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे. त्याचे परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्येही उमटत आहेत. अनेक कंपन्या जुने कर्मचारी कपात करून कमी पगारावर नवशिकाऊ उमेदवारांना नोकरी देण्यावर भर देत आहेत. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आयटी कंपन्या नोकरीसाठी नियुक्तीपत्र देत आहेत. मात्र, प्रत्यक्ष नियुक्ती होण्याचा कालावधी सहा महिने, वर्षभरानंतरचा देत आहेत. हा कालावधी पुर्ण झाला तरी या तरूणांना नोकरीवर रूजू केले जात नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे समस्यांचे गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, नेमक्या तक्रारी कोणाच्या आहेत, त्याचा सविस्तर अहवाल देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर कारवाई करू, असे ते म्हणाल्याचे आयटी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानुसार फोरमच्या वतीने प्रत्यक्ष तक्रारी करण्यासाठी तरूण घाबरत असल्याने ऑनलाइन पद्धतीने गुगल सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत नियुक्तीपत्र देऊनही कामावर रूजू न केलेल्या तरूणांना तक्रारी करण्याचे आवाहन केले. त्यासाठी नाव, मोबाईल नंबर व संबंधीत कंपन्यांची नावे देखील नमूद करण्याचे आवाहन केले. तक्रारी करणाऱ्या तरूणांची नावे केवळ फोरमकडेच राहतील ती उघड केली जाणार नाहीत, याची शाश्वती देण्यात आली आहे. त्यानुसार एका महिन्यात तब्बल 200 तरूणांच्या तक्रारी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजकडे जमा झाल्या आहेत. या तक्रारींचा अहवाल घेऊन शासन दरबारी आपले प्रश्न मांडण्यात येणार आहे.
नामांकित आयटी कंपन्या नोकरीसाठी नियुक्तीपत्र देत आहेत. मात्र कामावर रूजू करण्याला सहा महिने, वर्षभर उशीर करत आहेत. तसेच काहींना कामावरच घेतलेले नाही. आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुगल सर्व्हेत आलेल्या तक्रारींचा अहवाल देणार आहे. त्यामधून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाईल.
– पवनजीत माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी.
प्रबोधन करण्यासाठी 15 जणांची टीम
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर हिंजवडीतील नामांकित आयटी कंपन्यांमधून नोकरीसाठी निवड झालेली असते. अनेकांना नियुक्तीपत्र देखील दिले जाते. रुजू होण्याचा कालावधी सहा महिन्यानंतरचा दिला जातो त्यामुळे हे तरुण इतर कंपन्यांच्या नोकरीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी दोन्हीही नोकऱ्यांना मुकण्याची वेळ येते. त्या बाबत आयटीमधील तरूणांनी एकत्र येत 15 जणांची टीम करून तरूणांचे प्रबोधन केले जात आहे. जी कंपनी त्वरीत नोकरीवर रुजू होण्याबाबत विचारत आहे, तिथे तातडीने रुजू होण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नोकरीमधील येणाऱ्या अडचणींची माहिती अगोदरच दिली जात आहे.