मुंबई – हिंदुत्वाच्या आडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. दोन्ही वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोन्ही नातू एकत्र आल्यानंतर आता यांना जा तू म्हणून सांगणार आहोत. कारण देश सध्या हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्वाच्या आडून देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकदा चीनला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला एक युवक भेटला होता. त्यावेळी ऑलिम्पिक सुरू होणार होते. चांगलं इंग्रजी बोलत आहेस यातून चांगले पैसे मिळतील, तू बीजिंगला जा असे सुचवले. त्यावर तो युवक म्हणाला की, मला जगायचे आहे. त्यावेळी मी त्याला म्हणजे काय करायचे आहे, असे विचारले.
तर त्यावेळी त्याने सांगितेले की, बीजिंगमध्ये सरकारच्या विरोधात एखादा बोलला तर दोन दिवसांत तो माणूस गायब होतो. सध्या भारतात देखील अशी परिस्थिती सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
मार्ग भिन्न असला तरी ‘नेताजी बोस’ व संघाचे उद्दीष्ट एकसमान – मोहन भागवत
मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले, त्यावेळी ते थोडे काळजीत वाटत होते. ते मला म्हणाले की, मी भाजपात जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर आज एफबीआयने छापा टाकला आणि काही कागदपत्र जप्त केली. मग येथील काही लोकांनी लगेच सांगितले तुम्ही भाजपात या तुम्हाला शांत झोप लागेल. त्यामुळे ते उद्या भाजपात किंवा मिंदे गटात गेले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला लगावला.