मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना (ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र यावेळी गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना चक्क त्यांची तुलना प्राण्यांशी केल्याचे दिसून आले.
मनसेने मुंबईत आयोजित केलेल्या ‘घे-भरारी’ या कार्यक्रमात गजानन काळे बोलत होते.यावेळी बोलताना, सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे यांची जीभ यावेळी घसरल्याचे पाह्यला मिळाले. यावेळी त्यांनी, “आता एक काळी मांजर आली आहे. रोज आडवी जात असते. शरद पवार यांनी संजय राऊतांना ठेवलं होतं, त्यातून पक्ष संपला होता. मग हे पार्सल राष्ट्रवादीतून शिवसेनेत का पाठवलं मला कळत नाही. उरले-सुरले बाप लेकच पक्षात राहणार असं वाटतं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात तलवार दिल्यावर हात लटपटतात हे विधान, सुषमा अंधारेंनी केलं होतं. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलही सुषमा अंधांरेंची वक्तव्य आहेत. तरीसुद्धा शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख मोठे नवाब उद्धव ठाकरे शांत आहेत,” अशी टीका गजानन काळे यांनी केली.
गजानन काळे यांनी संजय राऊतांवर देखील या कार्यक्रमा दरम्यान, टीका केली. “त्यांनी शिल्लक सेनेचे अरविंद केजरीवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. शिल्लक सेना जम्मू-काश्मीरची निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला कळेना नेमकी गांजाची शेती यांनी कुठं लावली, असा टोला गजानन काळेंनी संजय राऊतांना लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना, “सकाळी ९ वाजता गांजा मारून सर्वांच्या समोर येत असतात. राहिलेला पक्ष संपला असून, जम्मू-काश्मीरची निवडणूक लढणार असल्याचं सांगत आहेत. बर अशा माणसाबरोबर फिरत आहेत, ज्याचा पक्षही अख्खा देशातून संपत आलाय. काही दिवसांपूर्वी आदूबाळ म्हणाले होते, मनसे संपलेला पक्ष आहे. पण, आपला शाप असा उलटा बसला की विरोधात बोलणाऱ्यांचा पक्षच संपत आला आहे,” असा टोमणा गजानन काळेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.