पिंपरी – पुणे-नाशिक महामार्गावरील बंद करण्यात आलेला मोशी टोलनाका गुरुवारपासून (दि. 5) पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी या टोलनाक्यावर 315 रुपये देऊन मासिक पास काढावा लागणार आहे. तर या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हलक्या वाहनांसह जड वाहनांना 15 रूपयांपासून 155 रूपये मोजावे लागणार आहेत. हा टोलनाका पुन्हा सुरू झाल्याने वाहन चालकांना नाहक आर्थिक भुर्दंडासह वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मोशीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद करण्यात आला होता. तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पुन्हा सुरू केला आहे. या ठिकाणी अचानकपणे पुन्हा टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. मोशी आणि चांडोली टोलनाका येथे सुधारित पथकर लागू करण्याबाबत प्राधिकरणाने 5 जानेवारी रोजी सूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांना आपल्या खासगी वाहनांसाठी 20 किलोमीटर प्रवासाचा सवलतीचा 315 रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे. पुढील एक वर्षासाठी हे दर असणार आहेत. 29.810 किलोमीटर लांबीच्या जुन्याच रस्त्यासाठी हा दर लागू राहणार आहे. अगोदरच पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. यामध्ये आता नागरिकांना आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडीत भर
टोलनाक्यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा, अशी मागणी वाहन चालकांची आहे.
मोशीतील बंद करण्यात आलेला टोल नाका पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. एकीकडे याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून याचे नियोजन करण्यात येत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यावर उपाय योजना करण्याऐवजी लोकांचा भार वाढविण्याचे उद्योग चालविण्यात येत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून धुळखात पडला आहे. हा प्रकार चीड आणणारा असून हा टोलनाका कायमचा बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आहे. हा टोल बंद न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.