पुसेगाव (प्रतिनिधी) – भाजपने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगू नये. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याची भाजपची एक रणनीती सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये असा इशारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं, त्यावेळी ही मंडळी कुठं होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. भाजप- हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली.
आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. या प्रकारानंतर अजित पवार यांची बाजू सावरताना आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल करत परखड मत व्यक्त केले.
शशिकांत शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यावेळी राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावेळी खासदार उदयनराजे यांनीही त्यांचा विरोध केला होता. त्यावेळी भाजपची मंडळी कुठं होती. त्यांनी सोईचे राजकारण करायचे का?”
जनताच भाजपचा कडेलोट करेल
भाजपकडून छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलण्याचे राजकारण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला संभाजी महाराज यांचा इतिहास सांगू नये. लवकरच जनता भाजपची कडेलोट करेल, असा इशाराही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.