मुंबई : दिशा सालियन प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या स्थापना करण्याची घोषणा केल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांकडून गेल्याआठवडाभरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या कामाकाजादरम्यान आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून आले. त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनीही या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. या सर्व मुद्द्यांचा समाचार आह शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून घेण्यात आला आहे.
शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून कोकणातील काही गाजलेल्या प्रकरणांबद्दल एसआयटी स्थापन करण्याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. “नागपूर ‘एनआयटी’च्या १६ भूखंड व्यवहारात ११० कोटींचे भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे यातील भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे व भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय! नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत. आमदार महेश शिंदे म्हणताहेत, ‘‘आम्ही खोके घेतले.’’ मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.
नारायण राणेंनी या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत काही गंभीर आरोप केले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं थेट राणेंचं नाव न घेता टीका केली आहे. याविषयी बोलताना, “सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ‘ढेकणासंगे हिराही भंगला’ अशी त्यांची गत झालेली दिसते. नागपूरच्या अधिवेशनात सरकारची लक्तरेच निघाली आहेत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
तसेच खोके सरकारात स्वयंभू चाणक्यांची भरमार झाली आहे. जो तो दुसऱ्यांना नैतिकता व शहाणपण शिकवीत आहे. सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर. या डोमकावळय़ाने संजय राऊतांच्या तुरुंगवासावर अज्ञानी भाष्य केले. त्यांनी राऊत यांची सुटका करताना न्यायालयाने दिलेले खरमरीत निकालपत्र एकदा भिंग लावून वाचायला हवे. केसरकरांच्या फुटीर गटात किमान 10-12 आमदार असे आहेत की, ते ईडी, सीबीआयच्या भयाने पळून गेले. तुरुंगात जावे लागेल या भीतीने त्यांनी पक्षांतरे केली. काय सांगावे, उद्या म्हणजे 2024 नंतर हे सगळे पुन्हा तुरुंगात नसतील कशावरून व त्यांच्या जोडीला हा सावंतवाडीचा डोमकावळाही असेल, अशी भविष्यवाणी आम्ही आजच नागपुरातून करीत आहोत, असे शिवसेनेने म्हटले आहे.