– शिवशंकर निरगुडे
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा खडकी धोतरा केलसूला या गावसह तालुक्यातील अनेक गावामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जंगली प्राणी रोही, हरीन, रानडुक्कर, कोल्हे हें प्राणी रात्रिच्या वेळी शेतात येऊन पिकांची नासाडी करत आहेत. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून कपाशीचे बोंडे, तुरीच्या शेंगा खातात. झाड मोडल्यामुळे त्या झाडांना येणारे बोंडे व शेंगा वाळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघते की नाही हाच प्रश्न शेतकऱ्याना भेडसावत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे बरेच शेतकरी मृत्यूमुखी पडलेत आणि तारांच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडण्यास वन विभागाची मनाई तर आम्ही वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण कसे करावे असाही प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बरेचदा नुकसान मोठे व भरपाई कमी असा प्रकार घडतो. त्यामुळे आर्थिक संकट शेतकऱ्यावर येते. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येऊ शकते. याकरिता संबंधीत विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.