मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असे म्हटले होते. दरम्यान,याच वक्तव्याचा चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे समाचार घेतला आहे.
संजय राऊतांविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याच बरोबर “अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध.” असेही चित्रा वाघ यांनी ट्विटरवरील व्हिडीओत म्हटले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महू येथे झालाय इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये ??
आमचे आदर्श असणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय ?
…(१/२) pic.twitter.com/qEqVIzi6B1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022
याचबरोबर संजय राऊतांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, “लो कर लो बात…सर्वज्ञानी संजय राऊत म्हणत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान.” असंही चित्रा वाघ यांनी म्हणत संजय राऊतांना टोला लगावला आहे.
लो कर लो बात…
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी म्हणताहेत
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला …अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे
तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान@BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/tTjb5GFjyW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 15, 2022
दरम्यान, “लोकशाहीमध्ये असं घडू नये पण दुर्दैवाने महाराष्ट्रात घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्यांनी लोकशाही जन्माला घातली त्या महाराष्ट्रात हे घडतय दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं.” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.