सिंधुदुर्ग – ‘आमच्या विचारांचा सरपंच निवडून न आल्यास गावाला एक रुपयाचाही निधी मिळू देणार नाही, मी सत्तेत असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाही’, अशी थेट धमकी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सिंधुदुर्गातील नांदगावात गेले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धमकीच दिली. दरम्यान, आता या धकमी प्रकरणी राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धमकी देणाऱ्या नितेश राणे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन म्हसकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले असून, नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होत…?
नितेश राणे म्हणाले, गावचा सरपंच आपलाच पाहिजे, नाहीतर विकासनिधी दिला जाणार नाही. जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे आकडेमोड आहे. आपण लपवाछपवी करत नाही. आम्ही नारायण राणेंच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहोत.
आम्ही पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाही. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही, याची मी निश्चीतपणे काळजी घेईन. आता याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा. कारण आता सगळा निधी माझ्या हातात आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे समजून घ्या, असे नितेश राणे म्हणाले.