शिमला – हिमाचल प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचा अंदाज काही मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी अपक्ष उमेदवारांपर्यंत पोहचण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातून तूर्त तरी अपक्षांचे महत्व वाढल्याचे चित्र आहे.
विधानसभेच्या एकूण 68 जागा असणाऱ्या हिमाचलात कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांकडे आलटून-पालटून सत्ता जाते. ती परंपरा कायम रहावी आणि यावेळी आपल्याकडे सत्ता यावी अशी कॉंग्रेसची इच्छा आहे. तर, परंपरा मोडीत काढून सत्ता राखण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्याआधी सोमवारी मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले. बहुतांश चाचण्यांनी भाजपला कौल दिला आहे. मात्र, काही चाचण्यांना कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाटत आहे. तर, काहींनी कुणालाच बहुमत नसणाऱ्या त्रिशंकू स्थितीचे भाकीत केले आहे.
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार
तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी आतापासूनच पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्रिशंकू स्थितीत सरकार स्थापनेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याची गरज भासेल. त्यामुळे दोन्ही पक्ष आतापासूनच अपक्षांशी संपर्क ठेऊन असल्याचे समजते.