नवी दिल्ली – बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडलेला संघ पाहिल्यावर आश्चर्यच वाटले. हा संघ नव्हताच तर सगळाच सावळा गोंधळ होता, अशा परखड शब्दात भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजय जडेजा याने सघ निवडीवर टीका केली आहे. एखाद्या विवाहाच्या वरातीत कसे कोणालाही कोणताही निकष न ठेवता सामील करुन घेतले जाते तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळाडूंची निवड केली गेली. रोटेशन पॉलिसीच्या नावाखाली सगळ्याच अनागोंदी कारभार आहे. एकेका खेळाडूला एखाद्याच सामन्यात संधी देण्याला रोटेशन पॉलिसी म्हणत नाहीत. तर प्रत्येक नवोदित खेळाडूवा सातत्याने पुरेशी संधी देणे म्हणजे रोटेशन पॉलिसी म्हणतात, असे जडजा म्हणाला.
‘या’ कारणामुळे पंत संघाबाहेर, संघ व्यवस्थापनाचा मोठा खुलासा
पहिल्या सामन्याचे विश्लेषण करायचे झाले तर बांगलादेशची फिरकी गोलंदाजी चांगली होती मात्र, भारतीय फलंदाज स्वतःच्याच चुकांमुळे बाद झाले. फटक्यांची निवड चुकली, फिरकीला आवश्यक फुटवर्क नव्हते. फलंदाज आक्रमक खेळायचे की संयमी तंत्रशुद्ध फलंदाजी करायची याच गोंधळात अडकल्याचे स्पष्ट जाणवत होते. बचावात्मक पवित्रा घेतला जातो त्यात गैर काही नाही पण सामन्याच्या सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजीच केली पाहीजे. सातत्याने बळी गमावल्यावर नंतर येणाऱ्या फलंदाजांकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा करणेच चुकीचे आहे, असेही जडेजाने म्हटले आहे.
झेल घेतले गेलेच पाहीजेत
भारतीय संघाने नियमित यष्टीरक्षकाला संघाबाहेर ठेवत लोकेश राहुलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात घेतले. अन्य फलंदाज बाद होत असताना त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्वाचीच होती मात्र, यष्टीरक्षण करताना त्याने मेहदी हसनचा सोडलेला झेलच भारतीय संघासाठी फटका ठरला हे विसरता कामा नये. कॅचेस विन मॅचेस असे म्हणतात त्यामुळे प्रत्येक झेल घेतलाच गेला पाहीजे तरच तूम्ही विजयाची अपेक्षा ठेवू शकता, असेही जडजाने म्हटले आहे.