नवी दिल्ली :– गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे भाकित कालच वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरातमध्ये भाजपचा एकतर्फी विजय होतो आहे तर कॉंग्रेसचे पानीपत होताना दिसते आहे. मात्र हे केवळ अनुमान असले तरी कॉंग्रेसजनांनी एक प्रकारे पराभव मान्यच करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या प्रचारात अनेक त्रुटी राहील्या होत्या अशी कबुलीही कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.
एकमात्र खरे की गुजरातमधील पराभव कॉंग्रेसने स्विकारला असला तरी हिमाचल प्रदेशबाबत हा पक्ष अजुनही आशावादी असल्याचे जाणवते आहे. एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, जर गुजरातमध्ये असे होणार असेल तर ते अत्यंत निराशाजनक आहे. आपण स्वत: सूरत आणि अहमदाबादच्या काही भागाच दौरा केला होता व त्यावेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे आपल्याला जाणवले. मात्र भाजपकडे आघाडी आहे आणि त्यांच्याकडे धनशक्तीही खूप जास्त आहे असे मला स्वत:ला वाटते.
जर एक्झिट पोलचे निष्कर्ष खरे ठरले तर पुन्हा एकदा धृवीकरणाच्या राजकारणाचे यश आहे. दुर्दैवाने हे गुजरातच्या बाबतीत सत्य आहे. गेल्या काही काळांत भारतीय जनता पार्टीने येथे एक खास वातावरण निर्माण केले आहे. पंतप्रधान आणि अन्य नेत्यांच्या प्रत्येक भाषणातून एक भिती निर्माण केली याशिवाय याचे कोणते स्पष्टीकरण असू शकत नाही.
कॉंग्रेसच्या अन्य एका नेत्याने गुजरातच्या निवडणुकांची घोषणा नंतर झाल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, अगोदर आपचा प्रचार जोरात होता. आम्ही मात्र अधिक खर्च न करण्याची, लहान बैठका घेण्याची, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनिती आखली होती. अरविंद केजरीवाल यांनी ज्या प्रकारे प्रचार केला ते पाहता त्यांनी कॉंग्रेस नाही तर त्यांचा पक्ष भाजपला पर्याय असल्याचे चित्र उभे केले. त्याचा परिणाम अखेर कॉंग्रेसची मते कमी होण्यातच झाला.