पिंपरी – गावातील घरपट्टी आणि पाणीपट्टी करवसुलीवर प्रत्येक ग्रामपंचायतीचे अर्थकारण चालते. मात्र, काही ग्रामपंचायती सोडल्या तर बहुतांश ठिकाणी ही कर वसुली करणे प्रशासनाला डोकेदुखी असते. यावर्षीही करवसुली संथ गतीने सुरू असून, ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ 41 टक्के पाणीपट्टी कर वसूल झाला आहे. तर मावळ तालुक्यात जिल्ह्याच्या तुलनेत सहा टक्क्यांनी पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्याची पाणीपट्टी वसुली देखील गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमीच आहे. त्यामुळे पुढील शंभर टक्के करवसुलीचे ध्येय पुढील चार महिन्यांत ग्रामपंचायती गाठणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला वसुलीचा वेग वाढवावा लागणार आहे.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील ग्रामपंचायतींकडून यावर्षी 59 कोटी 24 लाख 85 हजारांची पाणीपट्टी वसुलीची एकूण मागणी होती. त्यापैकी आतापर्यंत 24 कोटी 87 लाख 56 हजार रूपयांची वसुली झाली आहे. त्यामध्ये भोर तालुक्यात सर्वाधिक 54.45 टक्के वसुली झाली आहे. दौंड 50.1, मुळशी 52.61 तालुक्यात 50 टक्क्यांहून अधिक वसूली झाली आहे. तर अन्य जिल्ह्यात 50 टक्क्यांच्या आत वसुली आहे. सर्वात कमी वेल्हे तालुक्यात 10 टक्के, मावळ आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी 35 तर शिरूरमध्ये 36 टक्के वसुली झाली आहे. या वसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे.
शेवटच्या महिन्यात मोठा भरणा
नागरिकांना पाणीपट्टी भरण्याकरिता 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरीदेखील पाणीपट्टी वेगाने वसुल व्हावी, याकरिता मालमत्ता कराच्या धर्तीवर आगोदर भरणा केल्यास कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून पाटणीपट्टी भरणा करण्यास अंतिम मुदतीची वाट पाहिली जाते. त्यामुळे शेवटच्या महिन्यात मोठा करांचा भरणा होत असल्याचा आजपर्यंतचा ग्रामपंचायत प्रशासनाचा अनुभव आहे.