सासवड -पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील व्यापारी संकुलात खऱ्या अर्थाने व्यापारी संकुल मात्र भांडवलदारांच्या ताब्यात असल्याचे दिसत आहे. व्यापारी संकुलामध्ये दिव्यांगांसाठी व महिलांसाठी आरक्षण ठेवण्याची शासनाची तरतूद आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे लिलाव न केल्यामुळे धनदांडग्याच्या ताब्यात हे गाळे गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या कल्पना खैरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
खैरे या गाळ्यामध्ये दहा वर्षे व्यवसाय करीत होते. गावामध्ये 31 व्यावसायिक गाळे ग्रामपंचायतीने बांधले आहेत. हे गाळे लिलाव पद्धतीने गावातील ग्रामस्थांना दिले आहेत, असे ग्रामपंचायतीकडून गावातील लोकांना सांगितले जात आहे. मात्र, खैरे यांनी भाडेतत्वावर घेतलेला गाळा त्यांना संबंधित मालकाच्या मुलाने रिकामा करावयास सांगितला. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात मागितलेल्या माहितीतून गाळे बेकायदेशीरपणे दिल्याचे खैरे यांच्या निदर्शनास आले आहे.
ग्रामपंचायत अधिनियमनुसार ग्रामपंचायतीच्या मालकीचा गाळा जो व्यक्ती लिलाव पद्धतीने व्यवसायासाठी घेईल. त्याच व्यक्तीने गाळा वापरावा, भाडेकरू नेमू नयेत. गरजू व्यक्ती व महिला, दिव्यांग व्यक्तींनाच ते गाळे द्यावेत, असे नियम असतानाही ग्रामपंचायतीकडून गाळे देताना लेखी व्यवहार केला नाही. ज्यांना गाळे दिले आहेत. त्यांनी पोटभाडेकरू नेमले आहेत, असे खैरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
माहिती अधिकारी पत्राला नो एंट्री
माळशिरसच्या सासवड- यवत रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य चौकात व्यापारी संकुलांचे लिलाव झाले. खैरे यांनी या विषयावर आवाज उठवून ग्रामपंचायतीकडे व्यापारी संकुलांसंदर्भात भाडेतत्त्वावर लिलाव केल्याची माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मिळावी यासाठी अर्ज देखील केला होता. परंतु त्यांना माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी थेट पंचायत समितीकडे मागणी केली आहे. तक्रार अर्जावर योग्य ती दखल घेऊन चौकशी व्हावी व न्याय मिळावा अशी मागणी खैरे यांनी केली.
दोन महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकारांमध्ये संपूर्ण माहिती संबंधितांनी मागितली होती. चार शासकीय इमारती असून वेगवेगळ्या योजनेमधून झाले आहेत. शासन नियमाप्रमाणे प्रक्रियेस विलंब होत आहेत. परंतु या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. याआधी माहितीच्या अधिकारात अनेकांनी कागदपत्रे मागवली होती. परंतु जेवढी कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहेत. ती दिलेली होती.
– महादेव बोरावके, सरपंच, माळशिरस.