पुणे-“प्रायोगिक रंगभूमीवर लेखक म्हणून तुम्ही तुम्हाला हवे ते मांडू शकता. परंतु व्यावसायिक रंगभूमीवर रसिकांना काय हवे ते मांडायचे असते. त्यामुळे आता चांगले लेखक तयार होत आहेत. रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता कशात आहे, हे लेखकाला सांगणे. त्याप्रमाणे नाटक लिहून आणि बसवून घेणे ही दिग्दर्शकाची जबाबदारी आहे,’ असे मत नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी गुरूवारी व्यक्त केले. नाटक क्षेत्रातील कंपूशाहीकडे मी नाटकात आल्याच्या पहिल्या दिवसापासून कधीच लक्ष दिले नाही. कायम माझी रेष कशी मोठी होईल, आणि लक्ष केंद्रीत करून काम करणे आणि ते चांगले करणे याकडे लक्ष दिले, असे दामले म्हणाले.
दामले यांनी 12 हजार 500 नाट्यप्रयोगांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. त्यानिमित्ताने श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट उपस्थित होते. “कामाचा आनंद नाटकात मिळतो, कारण माझे आवडीचे “बीट’ नाटक आहे. उगाच हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला जायचे. पैसे येथेही मिळतात, मराठी रंगभूमीने मला काहीच कमी पडू दिले नाही. मुळात हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाण्याची माझीच इच्छा नव्हती. महिनाभर जायचे आणि नाटक बंद ठेवायचे हे मला मान्य नाही. जमलेली टीम मोडणे मला योग्य वाटले नाही. निर्माता म्हणूनही नाटक उभे केले त्यात आमची टीम चांगली तयार झाली आहे. चित्रपट विषयात सुधारणेला वाव नाही. चित्रपटात कलाकार उत्तरदायी नाही. पण, नाटकात कलाकार उत्तरदायी आहे. 22 जणांची टीम असते त्यांनी एकमेकांच्या चुका झाकल्या आणि लेखन चांगले नसले तरी ते नाटक उत्तम होते. चुका होत राहणार पण दुरुस्त करायची संधी मिळाली तर ते नक्कीच दुरुस्त करावे,’ असे दामले यांनी नमूद केले.
“एनर्जी टिकवण्यासाठी कमी बोलतो आणि दर सहा महिन्यांनी आयुर्वेदिक डॉक्टरांकडून शरीरशुद्धी करून घेतो. तसेच आज काय घडले याचा विचार न करता पान उलटून झोपायला शिकलो. आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना जसे सांभाळतो, तसेच नाटकातील सर्व टीमलाही करोना काळात कुटुंबिय म्हणूनच सांभाळले, ते माझे कर्तव्यच होते,’ असे दामले यांनी सांगितले. “ओटीटी प्लॅटफॉर्म उत्तम आहे. त्यामुळे खूप जणांना काम मिळाले, खूप जणांना संधी मिळाली. आपले काम चोख राहिले तर त्याचा खप कमी होत नाही, हा माझा अनुभव आहे,’ असे ते म्हणाले.
बालगंधर्व रंगमंदिर पूर्ण कधी होणार, याची तारीख जाहीर करा
कोणत्याही सरकारी प्रशासनासाठी नाट्यगृह हा शेवटचा ऑप्शन असतो. त्या नाट्यगृहाला आवाज मिळवून देण्यासाठी काहीतरी करावे लागणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यात आता स्वारस्य दाखवले आहे. लवकरच आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधणार असतील तर ते कधी पूर्ण होणार याची तारीख त्यांनी आधी जाहीर केली पाहिजे. कारण वर्षानुवर्षे अशा वास्तूंचे बांधकाम होत नाही, असे दामले म्हणाले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील छोट्या सभागृहाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून झालेच नाही याकडे लक्ष वेधले.
राजकारणी लोकांची विनोदबुद्धी शाबूत
राजकारणातील विषयांवर चांगले नाटक लिहिले गेले पाहिजे, तर करायला काही हरकत नाही. 50-60 टक्के लोकांना राजकारणात स्वारस्य नसते. उरलेल्या 30-35 टक्के स्वारस्य असलेल्या लोकांसाठी नाटक करणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणे आहे. परंतु जेथे संधी मिळते तेथे राजकारणावर मी डायलॉग मारतो. राजकारणी लोकांची विनोदबुद्धी शाबूत आहे. काहीही बोललो तर त्यांना त्यातला विनोद समजतो, असे दामले म्हणाले.