पुणे -खडकवासला धरणसाखळीतून पालिका दरवर्षी सुमारे 22 टीएमसी पाणी घेते. पण, त्यातील सात ते साडेसात टीएमसी पाण्याची गळती होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने कालवा समितीच्या बैठकीत केला होता. ही गळती रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत तसेच महापालिकेकडून सुरू असलेल्या पाण्याच्या दिर्घकालीन उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान, महापालिकेचा वाढता पाणी वापर लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडकवासला जॅकवेल येथील पाण्याच्या पंपाचे नियंत्रण जलसंपदा विभाग स्वत:कडे मागण्याची शक्यता आहे. कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका 22 टीएमसी पाणी वापरत असल्याची री पालकमंत्री पाटील यांनी ओढली होती. मात्र, त्यातील जवळपास सात टीएमसी पाण्याची गळती होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही गळती रोखण्यासाठी महापालिका समान पाणीपुरवठा योजना राबवित असून, त्याद्वारे शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही राबविला जात आहे. त्यामुळेही शेतीसाठी पाणी मिळणार आहे. मात्र, या योजनांना एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
पाणीगळतीची प्रमुख कारणे
नादुरुस्त जलवाहिन्या
30 ते 40 वर्षे जुन्या जलवाहिन्या
सोसायट्यांच्या सबवेलमधून गळती
अनधिकृत नळजोड
कालव्याच्या कडेला सुरू असलेल्या अनधिकृत विहिरी
अनधिकृत टॅंकरपॉइंट
बांधकामांना अनधिकृतपणे वापरले जाणारे पिण्याचे पाणी