कोयनानगर (विजय लाड,प्रतिनिधी) :- प्रकल्प एक पण फायदे अनेक अशी ओळख असणाऱ्या कोयना प्रकल्पाला घरघर लागण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून वीज निर्मिती संचाकडे पाणी वाहून देणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. अशातच प्रकल्प उभारणीपासून १९७६ नंतर या प्रकल्पाचे ऑडिटच करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे सुरक्षा ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली असून ऑडिट न केल्यास कोयना प्रकल्पाला धोका संभवू शकतो.
साठ वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सेवेत असलेल्या कोयना प्रकल्पाचे 1976 नंतर सुरक्षा ऑडिट झालेले नाही. मात्र, वीज निर्मितीसाठी पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागल्यानंतर सुरक्षा ऑडिटची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती देताना जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक म्हणाले, “कोयना प्रकल्प महाराष्ट्राचे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. 16 मे 1962 ला कोयना जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती सुरू झाली. राज्यातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी 59 टक्के वीज एकटा कोयना प्रकल्प राज्यातील जनतेला देतो. या प्रकल्पाला 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पात वीज निर्मितीसाठी असणारी यंत्रसामग्री कालबाह्य होण्याची शक्यता आहे. हे अधिजल भुयाराला लागलेल्या गळतीवरून स्पष्ट झाले आहे.
कोयना धरणातील पाणी सर्जवेलच्या ठिकाणी आणले जाते आणि तेथून ते वीज निर्मितीसाठी पाठवले जाते. या बोगद्याना दिलेले सिमेंटचे अच्छादन निघाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी काळ्या दगडातून झिरपून डोंगरात ज्याठिकाणी जागा मिळेल, त्याठिकाणी बाहेर पडत आहे. त्याचा धोका कोयना प्रकल्पाला नाही. मात्र, कोयना हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. येथे ६० वर्षात लाखो भूकंप झाले आहे. 3 रिश्टर स्केलपेक्षा मोठ्या भूकंपाची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कालानुरूप काही गोष्टी बदललेल्या असू शकतात. त्यामुळे स्ट्रक्चरचे सुरक्षा ऑडिट होण्याची गरज आहे.”
“कोयना धरणातून वीजनिर्मिती करणाऱ्या संचापर्यंत पाणी नेणाऱ्या यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट झाल्यास ही यंत्रणा कोणत्या अवस्थेत आहे; हे समजेल. काही उपायोजना करणे गरजेचे आहे का, हेही लक्षात येईल. अन्यथा, धरणातून वीजनिर्मिती संचाकडे जाणारे पाणी कमी प्रमाणात जाईल आणि त्याचा फटका वीज निर्मितीला बसून कोयना प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता कमी होईल. मात्र, प्रकल्पाला धोका होणार नाही.
– दीपक मोडक (सेवानिवृत्त मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, कोयनानगर).
कोयना धरण मजबूत स्थितीत आहे. पोफळी, अलोरे आणि कोळकेवाडी येथील वीज निर्मिती करणाऱ्या संचाची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती केली जाते. कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा एक व टप्पा दोनची क्षमतावाढ नुकतीच झाली आहे. दोन्ही प्रकल्पांतून 5 मेगावॉट क्षमतेची वाढ झाली आहे. त्यामुळे धरण आणि वीज निर्मिती करणाऱ्या संचाच्या सुरक्षा ऑडिटचा प्रश्न येत नाही.
मात्र, धरणापासून वीजनिर्मिती करणाऱ्या संचापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. हे ऑडिट यापूर्वीच व्हायला हवे होते. मी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशा सूचनाही केल्या होत्या. मात्र, सर्जवेलला गळती लागल्यानंतर हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला असल्याचेही त्यांनी यावेळी दै. प्रभातशी बोलताना सांगितले.