पुणे, दि. 15 – शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नियमितपणे कामकाज करण्याची शिस्त लागावी, यासाठी अधिकाऱ्यांनी डायऱ्या तयार करुन त्यात नोंदी करण्याची संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. शिक्षण आयुक्तालयामार्फत अधिकाऱ्यांनी डायरीत केलेल्या नोंदीची कसून तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून खऱ्या नोंदी व खोट्या नोंदी यांचे पितळ यातून उघडे पडणार आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जलद गतीने व पारदर्शकपणे कामे व्हावीत यादृष्टीने अधिकाऱ्यांना कामकाजाचा प्राधान्यक्रम ठरवून दिले होते. याची अंमलबजावणी झाली की नाही याच्या नोंदी डायरीत अपडेट ठेवण्याबाबतचे आदेशही बजाविण्यात आले होते. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाची विविध ध्येय-धोरण, प्रकल्प, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनातर्फे राज्यस्तर ते शाळा स्तरापर्यंत यंत्रणा कार्यरत आहे. सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
दररोज नोंदी आवश्यक
अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजना, आस्थापनाविषयक कामकाज, शाळांना भेटी, अधिनस्त कार्यालयांना भेटी देण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. सर्व कार्यालयांचे प्रमुख संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी या सर्वांनी डायरीत दररोज नोंदी करणे आवश्यक करण्यात आले होते.
काही अधिकाऱ्यांनी डायरीत नोंदी करताना मोघम नोंदी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सविस्तर नोंदी न करता केवळ आकडेमोडीला प्राधान्य दिलेले आहे. भेटीतील महत्वाच्या बाबी अधिकाऱ्यांनी डायरीत नोंदविणे अपेक्षित आहे. मात्र सर्वांकडून तसे झाल्याबाबत साशंकता आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान दोन व महिन्यात आठ ते दहा शाळांना भेटी देऊन निरीक्षण अहवालातील बाबींचे अनुपालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अपेक्षित कामकाज, कार्यवाही पूर्ण, कार्यवाही पूर्ण न होण्याची कारणमिमांसा, कार्यालयीन कामकाजाचे दिवस, दौऱ्यांचे दिवस, शासकीय सुट्टया,किरकोळ व दीर्घ मुदतीच्या रजा, रात्रीचे मुक्काम याबाबतच्या वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या नोंदी डायरीत करणे बंधनकारक आहे.