येरवडा, दि. 13 (प्रतिनिधी) – महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या कर्मवीर भाऊराव पाटील क्रीडानिकेतनने शाळेच्या इमारतीतील तीन खोल्यांना कुलूप लावले. त्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर तसेच व्हरंड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. सकाळची शाळा असल्याने थंडीचाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसूनच परीक्षा द्यावी लागली.
दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाली. त्यानंतर मुलांना अशाप्रकारे जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. यावर आमदार सुनील टिंगरे यांनी शाळेतील अवस्था पाहण्यासाठी तत्काळ धाव घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक महेंद्र पठारे, नारायण गलांडे होते.
कै. अनुसया सावंत विद्यालयात 6 शाळा आहेत. मागील काही वर्षांपासून शाळेकडे लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे. सहापैकी दोनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आहे. पावसाळ्यात चिखल तुडवत येणारी मुले, अस्वच्छ स्वच्छतागृह, वीज नसणे, क्रीडांगणाची दुरवस्था, भटक्यांचा मुक्त वावर असतो.
शाळेच्या परिसरात मद्यपान, धुम्रपान यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षेबाबत दैनिक “प्रभात’ने यापूर्वी वृत्त दिले होते. यावर क्षेत्रीय कार्यालयाने थोडे कामही केले होते. शाळेत नवीन स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आहे. मात्र, यासाठी निधी उपलब्ध करू, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले. पण, फाइल पुढे सरकलेली नाही.
शाळेबाबत पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. शाळेची पाहणी केली असून, आयुक्तांना फोन केला होता. मात्र, त्यांनी उचलला नाही. विद्यार्थ्यांना लवकरच वर्गखोल्या देण्यात येईल.
– सुनील टिंगरे, आमदार, वडगावशेरी मतदारसंघ
…म्हणून जमिनीवर बसण्याची वेळ
कर्मवीर भाउराव पाटील शाळेसाठी स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थी व शिक्षक स्व. लोकनेते यशवंतराव चव्हाण शाळेच्या स्वच्छतागृहाचा वापर करत होते. मात्र, येथील स्वच्छतागृह सतत तोडले जाते. सध्याही ते तुटलेल्या अवस्थेत असल्याने माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना याचा वापर करण्यास येथील मुख्याध्यापकांनी मज्जाव केला होता. यामुळे शिक्षकांनी येथील तीन खोल्यांना कुलूप लावले.