अभिवादन (विलास पंढरी) : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंची आज 133 वी जयंती. देशात लोकशाही रुजविण्याचे आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. देशातील बालकांवर त्यांचे निर्व्याज प्रेम होते. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस “बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे म्हणजेच बालदिन साजरा केला जातो. 1959 सालापर्यंत बालदिन ऑक्टोबरमध्ये साजरा केला जात असे. 1954 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. “लहान मुलांमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय, धर्मांबाबतचे सामंजस्य वाढून जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी’ असा हेतू बालदिन साजरा करण्यामागे होता. “युनो’च्या आमसभेने बालहक्कांची सनद 1989 मध्ये स्वीकारली. 1989 मध्येच बालहक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. हे हक्क आतापर्यंत 200 पेक्षा अधिक राष्ट्रांनी मान्य केले आहेत.
बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांनी 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रसूत केला होता. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे, असा या जाहीरनाम्याचा हेतू आहे. संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेमध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक मनुष्याला सर्व मानवी हक्क व स्वातंत्र्ये मिळविण्याचा हक्क आहे. मग त्या बाबतीत जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय वा अन्य मतप्रणाली, राष्ट्रीय वा सामाजिक उत्पत्ती, मालमत्ता, जन्म वा अन्य दर्जा ह्यांचा विचार केला जाता कामा नये. शारीरिक वा मानसिक अपरिपक्वतेमुळे बालकाची अधिक काळजी व संगोपन करावे लागते; त्याला कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते. बालकाची योग्य ती काळजी व निगा घेण्याची तरतूद 1924 च्या बालकहक्कासंबंधीच्या जिनीव्हा घोषणेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यातील ठरावात बालकाला समृद्ध बाल्य लाभावे, स्वतःसाठी तसेच समाजाच्या भल्याकरिताही त्याला सर्व अधिकार व स्वातंत्र्ये उपलब्ध करण्यात यावीत; पालक, ऐच्छिक संघटना, स्थानिक संघटना, राष्ट्रीय सरकारे यांनी बालकांच्या हक्कांची जाणीव लक्षात घेऊन त्यांचे विधिवत पालन करावे. नमूद करण्यात आले आहे
सर्वांत पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जगभर साजरा करण्यात आला. ह्यासाठी जिनीव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेचा पुरस्कार लाभला होता. त्यानंतर कै. श्री. व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनीही आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पना उचलून धरली व 1954 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ती स्वीकाली. हल्ली 1954 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन मानला जातो.
बाल दिन हा खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरुन 20 नोव्हेंबर हा “जागतिक बाल दिन’ म्हणून बहुतेक देशांत साजरा होत असला तरी भारतात मात्र त्यांच्या लहान मुलांवरील प्रेमाचे प्रतिक म्हणून भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण होती. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे. जनरली सहृदय लोकांना लहान मुलं फारच आवडतात आणि मुलंही अशा लोकांना जीव लावतात. नेहरूही असेच होते. लहान मुलांच्या बाबतीतली त्याची काही उदाहरणं पाहिली की लक्षात येतं की त्यांना “मुलांचे चाचा नेहरू’ का म्हटलं जायचं ते !
एकदा नेहरूंना एका सभेला जात असताना रस्त्यात लागणाऱ्या एका गावातील लोकांना त्यांचा सत्कार करायचा होता. सरकारी अधिकाऱ्यांनी “वेळेअभावी नेहरू थांबणार नाहीत’ असे गावकऱ्यांना सांगितले. नेहरूंना लहान मुले फार आवडतात. याचा फायदा घेण्यासाठी गावकऱ्यांनी एक युक्ती केली. हातात रंगीबेरंगी फुले घेऊन छोट्या मुलांना नेहरूंच्या येण्याच्या मार्गावर दुतर्फा उभे करण्यात आले. गावकऱ्यांची युक्ती कामी आली. मुलांना पाहून नेहरू गाडीतून खाली उतरले. त्यांच्यात नुसते मिसळले एवढेच नाही तर त्यांच्या शाळेत जाऊन मुलांशी गप्पा मारल्या. लोकांकडून सत्कारही स्वीकारला. असेच एकदा नेहरू एका महत्वाच्या मीटिंगला चालले होते. रस्त्याच्या कडेला एक बाग होती. तेथील झाडांवर पिकलेल्या जांभळाचे घोस लटकत होते. परंतु झाडाखाली किंवा आजूबाजूला जांभळे खाताना व किंवा बागेत खेळताना नेहरूंना एकही मूल दिसले नाही. त्यांनी गाडी थांबवली व चौकशी केली. तेंव्हा त्यांना कळले की ती बाग नगरपरिषदेची असून बागेत कुणीही जाऊ नये म्हणून रखवालदार ठेवलेला होता. नेहरू एकदम भडकले. संबंधित अधिकाऱ्याला बोलावून घेतले व व सांगितले. “मला माझी मुले या बागेत खेळताना दिसली पाहिजेत. मुलांना आनंद मिळू द्यात. हीच मुले उद्याची नागरिक आहेत. मी या रस्त्याने जेंव्हा परत येईन तेंव्हा इथे राखणदार असता कामा नये.’ असेच एकदा लाल बहाद्दूर शास्त्री आणि नेहरू एकत्र प्रवास करत होते. रस्त्याकडेला झाडांना बांधलेल्या झोक्यांवर मुले झोके घेत होती. नेहरूंनी गाडी थांबवली व खाली उतरून मुलांबरोबर ते झोका खेळले. ही वेगळी खेळकर कृती पाहून शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “पंडितजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात.’ त्यांना मध्येच थांबवत नेहरू म्हणाले, “तुम्ही कोण आहात? शास्त्रीजी उत्तरले, “लालबहादूर’. त्याचवेळी नेहरू शास्त्रीजींना म्हणाले, “तुम्ही लालबहादूर तर मी बालबहादूर’. ही काही उदाहरणं पंडित नेहरूंचं बच्चे कंपनीशी असलेलं नातं आपल्याला सांगतात.
पण भारतातल्या अनेक सार्वजनिक ठिकाणी, झोपडपट्ट्यांमधे उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली असंख्य मुलं दिसतात. शेवटी हीसुद्धा मुलंच. त्यांनाही गोड- धोड खावं, शाळेत जावं, चांगलं रहावं असं वाटत असेलंच की. पण, आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.या निमित्ताने सरकारने व विशेषतः कॉंग्रेसने पक्ष पातळीवर अशा मुलांसाठी नेहेरू जयंतीनिमित्ताने काही विशेष योजना आखल्यास नेहरूंना खरी श्रद्धांजली ठरेल.