म्हाळुंगे, दि. 13 (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपये खर्च करूनही अस्वच्छता, साठवलेले भंगार, राडारोडा, अंत्यविधीचे टाकाऊ साहित्य तेथेच पडलेले, झाडीझुडपे, भटक्या श्वान-डुकरांचा वावर यामुळे बावधन स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत पोहचली आहे.
बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्द एकमेकांना लागून असलेली दोन उपनगरे रामनदी तिरावर वसली आहेत. दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे 50 हजारच्या आसपास आहे. यापैकी बावधन खुर्द हे 15 ते 20 वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत जोडले गेले. तर, मुळशी पंचायत समितीत असणारे बावधन बुद्रुक हे आता नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी दोन्ही गावांची मिळून बावधन बुद्रुक येथे एकच स्मशानभूमी आहे. त्यामुळे तेथे सर्व आवश्यक सुविधा असणे अपेक्षित आहेत. पण, त्याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. कोविड काळात निधीपुरवठा न झाल्याने येथील विकास रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या येथे अंत्यविधीसाठी एकच शेड असून, तेथेच एक विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी साधारण चार अंत्यविधी होऊ शकतात.
तर, “दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी स्मशानभूमीसाठी मिळवला होता. सध्या येथे अस्वच्छता, दुर्गंधी आणि झाडझुडपांमुळे महिलांना रात्रीच्यावेळी अंत्यविधीसाठी जाण्याची भीती वाटते,’ अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रा. सविता दगडे पाटील यांनी दिली.
स्मशानभूमीच्या गेटवर आरोग्य कोठी आहे. पण, स्मशानभूमी स्वच्छतेसाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. दोन्ही बावधनचे दोन आरोग्य निरीक्षक आहेत, पण कैफियत कोणाकडे मांडायची, तेच समजत नाही. स्वच्छता करणे नागरिकांदृष्टीने गरजेचे आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून काय झालं?
– दिलीप दगडे पाटील, माजी उपसरपंच, बावधन बुद्रुक
स्मशानभूमी सुधारण्यासाठी कोविड काळापूर्वी दोन ते तीन वर्षांपासून निधी मिळालेला नाही. त्यापूर्वी दीड कोटींचा निधी मिळाला होता. परंतु, आलेले सर्वच निधी कोविडमुळे परत गेले. आता आमची मुदत संपली आहे. त्यामुळे पालिकेवर प्रशासक राज आहे. प्रशासन आणि अधिकारी काम करत नाहीत.
– किरण दगडे पाटील, माजी नगरसेवक
आमच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडचा कोट्यवधी रुपयांचा निधी स्मशानभूमीच्या कामासाठी वापरला आहे. त्यातील जवळपास 80 टक्के निधी माझ्या बजेटमधला आहे. स्मशानभूमीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. याबाबत अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
– दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेवक
बावधन बुद्रुक हा भाग ग्रामपंचायतीत असताना
50 लाख रुपयांचा निधी स्मशानभूमी सुधारासाठी वापरण्यात आले. ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमी असताना पूर्णपणे स्वच्छता होती. परंतु पालिकेच्या ताब्यात गेल्यापासून दुर्लक्ष झाले आहे.
– पियुषा दगडे पाटील, माजी सरपंच, बावधन बुद्रुक